मुंबई: मुंबईतील काही भागात रात्री मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याच्या तक्रारी पालिकेकडे दाखल झाल्या. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मुंबईतील चेंबूर, गोवंडी, भांडूप, पवई, विक्रोळी, घाटकोपर या भागातून रात्री गॅस गळतीच्या तक्रारी पालिकेच्या आपत्कालीन विभागात प्राप्त झाल्या.
या तक्रारीनंतर अग्निशमन दलाच्या 13 गाड्या दाखल झाल्या. मात्र मुंबईत गॅस गळती झालेली नाही, असे स्पष्टीकरण अग्निशमन दलाने दिले आहे. तसेच परिस्थिती पूर्ववत असल्याचेही सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवंडी परिसरातील फार्मास्युटिकल कंपनीतून गॅस गळती झाल्याचा दावा स्थानिकांनी केला.
यानंतर अग्निशमन दल, आपत्कालीन विभाग, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या सर्व पथकांनी रात्रभर विविध ठिकाणी नेमकी गळती कुठून होत आहे याचा शोध घेतला. त्यासोबतच दक्षता म्हणून प्रशासनाने संबंधित ठिकाणी जाऊन घाबरू नका असे आवाहन केले. खबरदारीचा उपाय म्हणून परिस्थितीचे निरीक्षण करण्यासाठी अग्निशमन दलाकडून संयंत्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत.
जर कोणालाही या वासामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्यास कृपया ओला रुमाल किंवा कपडा नाकाभोवती गुंडाळावा, असेही आवाहन पालिकेने केले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन नागरिकांनो घाबरू नका, असे आवाहन केले होते.