मनसेसोबत युतीच्या चर्चेला पूर्णविराम
पुणे – महापालिकेत गेल्या चार वर्षांत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच नगरसेवकांनी चांगले काम केले आहे. या कामाबाबत आपण समाधानी असून अगामी निवडणुकीसाठी आम्हाला कोणताही नवीन मित्र जोडण्याची गरज नाही. त्यामुळे आम्ही महापालिका स्वबळावराच लढवू आणि जिंकूही असे सांगत, राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पालिका निवडणुका मनसेसोबत लढण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
महापालिका निवड्णुकांच्या तोंडावर फडणवीस यांनी गुरुवारी महापालिकेस भेट देत शहरातील सुरू असलेल्या प्रमुख 21 प्रकल्पांचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते गणेश बिडकर भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह, पक्षाचे सर्व आमदार तसेच माजी आमदार यावेळी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, महापालिकेच्या सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी महापौरांनी भेट देण्याची विनंती केली होती. त्यानुसार, ही आढावा बैठक आहे. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली असून त्यातील राज्यशासनाकडे प्रलंबित असलेल्या विषयांवर आपण स्वत: शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत. त्याबाबतच्या सूचना आयुक्तांना केलेल्या आहेत. या शिवाय, भाजप नगरसेवकांचे काम समाधानकारक आहे. त्यामुळे, महापालिका निवडणूकांसाठी आम्हाला कोणत्याही नवीन मित्राची गरज नाही तर आम्ही आमच्या कामाच्या जोरावर स्वबळावरच महापालिका जिंकू, असा विश्वास या वेळी फडणवीस यांनी व्यक्त केला.
महापालिकेत लक्ष घालणार
दरम्यान, भाजपच्या या आढावा बैठकीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरिश बापटांच्या अनुपस्थिती बाबत विचारले असता, मी सगळयाच महापालिकेत जातो. तसेच या पुढे मी सगळयाच महापालिकांमधे लक्ष देणार असल्याचेही फडणवीस म्हणाले. दरम्यान, गेल्या दोन महिन्यात तिसऱ्यांदा फडणवीस यांनी पुण्याच्या प्रश्नांबाबत पुढाकार घेतल्याने फडणवीस हे महापालिकेत लक्ष घालणार असल्याचे बोलले जात आहे.
अभय योजनेचे कौतुक
या वेळी फडणवीस यांनी महापालिकेने राबविलेल्या अभय योजनेचे तोंडभरून कौतुक केले. करोना संकटाच्या काळात महापालिकेने राबविलेल्या अभय योजनेमुळे महापालिकेस जवळपास 500 कोटींचा महसूल मिळाला असून ही बाब अत्यंत चांगली आहे. पुणे महापालिकेच्या धर्तीवर भाजपच्या ताब्यात असलेल्या राज्यातील इतर महापालिकांमध्येही थकबाकी वसुलीसाठी या योजनेची अंमलबजावणी करावी त्यासाठी संबंधितांना याबाबत सूचना करण्यात येणार असल्याचे फडणवीस म्हणाले.