शिरगाव – सोमाटणे आणि परिसरात मोठ्या प्रमाणावार नव्याने झालेल्या प्लॉटिंगमध्ये प्लॉट धारकांनी पाण्याचे साधन म्हणून कूपनलिका (बोअर) घेण्यावर जास्त भर दिला आहे. हि गोष्ट भूजल पातळी खोल जाण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. असे खोल आणि विनापरवाना कूपनलिका (बोअर) घेणे भूजलपातळी साठी आणि पर्यायाने निसर्गासाठी फार घातक असल्याचे मत निसर्ग तज्ञांनी व्यक्त केले आहे.
मावळ तालुक्यातील जमिनीला सोनायाचा भाव आला आहे. अनेक जण याठिकाणच्या जमिनीत गुंतवणुक करीत आहेत. सोमाटणे, शिरगाव, सांगवडे, साळुंब्रे, गहुंजे, दारुंब्रे आदी गावात अलीकडे प्लॉट घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. प्लॉट रजिस्ट्रेशन झाल्यावर लगेच प्लॉट धारक कूपनलिका (बोअर) घेण्याच्या प्रयत्नात असतात. यासाठी कोणतीही शासकीय परवानगी घेतलेली नसते. शिवाय जमिनीत खूप खोलवर बोअर घेतला जातो. या बोअरमुळे जरी तात्पुरती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होत असली, तरी हे निसर्गाच्या दृष्टीने घातक आहे. शुद्ध व आरोग्यास हानीकारक कमी जागेत, कमी खर्चात तयार होणार्या मात्र, पाण्याचे पुनर्भरण लवकर होत नसल्याने पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे.
पावसाळ्यात पडलेले पाणी विहिरीमध्ये थेट जमा होते. मात्र, बोअरवेलचे तसे नाही, पावसाचे पडलेले पाणी सहजासहजी बोअरवेलमध्ये मुरतच नाही. पावसाचे पाणी 40 ते 50 फुटापर्यंत जिरण्यासाठी कित्येक वर्षांचा कालावधी लागतो. तत्पूर्वी जमिनीतील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याने पाणीपातळी खालावली आहे. पाण्याची पातळी खालावत असल्याने बोअरवेल अधिक जास्त खोल खोदावे लागत आहेत.
काही वर्षांपूर्वी 15 ते 20 फुटांवर मुबलक पाणी लागत होते. परंतु आता जमिनीतील पाणीपातळी कमी झाल्याने ग्रामीण भागात पाण्यासाठी बोअरवेल खोदण्याचे प्रमाण भलतेच वाढले आहे. त्याचबरोबर पाणी न लागलेल्या, कोरडे गेलेले बोअरवेल तसेच उघडे ठेवण्याचा बेजबाबदारपणाही वाढलाय असे निदर्शनास येते. अशा बोअरवेल जीवघेण्या ठरत आहेत. बोअरवेलच्या जंजाळात अडकून हकनाक बळी गेल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत आणि आताही या घटनांमध्ये खंड नाही.
पाणी टंचाईचा सामना करताना हा नवीनच प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्य म्हणजे पाण्याची खोल खोल जात असलेली पातळी याला कारणीभूत आहे. कारण त्यासाठीच नियम तोडून अधिकाधिक खोल बोअरवेल खणल्या जात आहेत, त्यामुळे बोअरवेलची संख्या आणि खोलीमोठ्या प्रमाणावर वाढत आहे. गावोगावी बोअरवेलचे जाळे घट्ट झाले आहे. या भयावह यंत्रणेवर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न व्हायला हवेत. परंतु ते होताना दिसत नाहीत, हि बाब खेदाची आहे.
बोअर घेणे चुकीचे नाही तर नुसतेच बोअर घेणे चुकीचे आहे. जर आपण जमिनीकडून आपण पाणी घेत असू तर तिला पुनर्भरणाच्या माध्यमातून ते परतही केल पाहिजे. परंतु दुर्दैवाने असे होताना दिसत नाही. जे होणे अत्यंत गरजेचे आहे. पूर्वी नांगरणी झाल्यावर खड्यांच्या माध्यमातून पावसाचे पाणी जमिनीत जिरायचे परंतु आता तसे होत नाही. याचा परिणाम भुजल स्तर कमी होण्यात होत आहे.
– महेश महाजन, निसर्ग तज्ज्ञ