नवी दिल्ली – रब्बी हंगामाची पेरणी चालू असतानाच काही ठिकाणी खताची टंचाई निर्माण झाली असल्याच्या घटना घडत आहेत. देशभर खतांचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खताची साठेबाजी करू नये, असे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे.
केंद्रीय रसायन आणि खत मंत्री मनसुख मंडाविया यांनी या संदर्भात म्हटले आहे की, डीएपीसह सर्व खतांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. त्यामुळे देशातील कोणत्याही भागात खताची टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये काही जण खताची साठेबाजी करण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने वेळीच यामध्ये हस्तक्षेप करून खताची साठेबाजी होणार नाही याकडे लक्ष द्यावे असे केंद्र सरकारने राज्यांना सांगितले आहे.
मंडाविया यांनी सांगितले की, गेल्या महिन्यापासून रब्बीची पेरणी चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खताची गरज आहे. खताची मागणी लक्षात घेऊन आवश्यक तेवढे खत पुरविण्यात आले आहे. बरोबर केंद्रीय खत विभागाचे देशातील परिस्थितीकडे बारीक लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्यांनी 41 लाख टन युरिया खताची मागणी नोंदवली आहे. केंद्र सरकारने मात्र यामध्ये कितीतरी वाढ करून 76 लाख टन युरिया उपलब्ध केला आहे. डीएपीची 17 लाख टनाचे मागणी असताना 18 लाख टन उपलब्ध करण्यात आले आहे.
एनपीके खताची 17 लाख टनाची मागणी आहे. त्या तुलनेत 30 लाख टन उपलब्ध करण्यात आले आहे. सर्वच खतांचा आवश्यकतेपेक्षा जास्त पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कसल्याही अफवांवर विश्वास न ठेवता जास्त खत बाळगू नये असे आवाहन त्यांनी केले.
बऱ्याच राज्यांमध्ये काहीजण खाताचा काळाबाजार करीत असल्याच्या बातम्या आमच्याकडे आल्या आहेत. त्यामध्ये राज्य सरकारने लक्ष घालावे आणि खताची उपलब्धता करून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असे त्यांनी सांगितले. देशांतर्गत खत उत्पादन वाढविण्याबरोबरच मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकार खताची आयात करीत असते. या वर्षी आवश्यक एवढी आयात करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.