Bharat Jodo Nyay Yatra – आसामातील भाजपचे सरकार लोकांना भारत जोडो न्याय यात्रेत सामील होऊ नये यासाठी धमकावत आहे. तसेच यात्रा मार्गावरील कार्यक्रमांना परवानगी नाकारत आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. पण लोक भाजपला घाबरत नाहीत, असे राहुल गांधी यांनी बिस्वनाथ चारियाली येथे झालेल्या सार्वजनिक मेळाव्याला संबोधित करताना सांगितले.
राहुल गांधी म्हणाले, आम्ही यात्रेचा भाग म्हणून लांबलचक भाषणे करत नाही. आम्ही दररोज सात ते आठ तास प्रवास करतो. तुमचे मुद्दे ऐकतो आणि हे मुद्दे मांडणे हा आमचा उद्देश आहे. यात्रेत सहभागी न होण्यासाठी लोकांना धमकावले जात आहे आणि मार्गावर कार्यक्रम घेण्यास परवानगी नाकारली जात आहे.
तर राज्यात काँग्रेसचे झेंडे आणि बॅनरचीही तोडफोड केली जात आहे. सरकारला वाटते की ते जनतेला दडपून टाकू शकतात. पण ही राहुल गांधींची यात्रा नाही, ही लोकांच्या आवाजाची यात्रा आहे. हे त्यांना कळत नाही, असे ते म्हणाले. आसाम सरकारला उद्देशून ते म्हणाले, की राहुल गांधी किंवा आसामची जनता तुम्हाला घाबरत नाही.
तुम्हाला जे हवे ते तुम्ही करू शकता. जेव्हा निवडणुका येतील तेव्हा काँग्रेस भाजपचा मोठ्या फरकाने पराभव करेल,” असे ते म्हणाले. राहुल गांधींनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे “देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री” असल्याच्या आरोपाचाही यावेळी पुनरूच्चार केला.