मुंबई : आमचा गटच खरी शिवसेना आहे असा दावा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने बंडखोर आमदारांचे सदस्यत्व पक्षांतर बंदी कायद्यान्वये रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्याच्या बातम्यांवर शिंदे यांनी हा दावा केला आहे. यावर आता शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यातील पेचप्रसंगावर विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे म्हणाल्या की, बंडखोरांची आमदारकी रद्द व्हायची नसेल तर त्यांना कोणत्या तरी पक्षामध्ये विलिन व्हावं लागेल. त्यांना एकतीर भारतीय जनता पक्षामध्ये किंवा बच्चू कडूंच्या प्रहार पक्षामध्ये विलिन व्हावं लागेल असं निलम गोऱ्हे म्हणाल्या. एकनाथ शिंदे यांच्या गटाला आता शिवसेना हे नाव वापरता येणार नाही असंही त्या म्हणाल्या.
शिवसेना आता नेमकी कोणाकडे जाणार या चर्चा सुरू असताना निलम गोऱ्हे यांनी शिवसेनेच्या घटनेविषयी माहिती दिली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना शिवसेना आपल्या हाती घेणे अत्यंत अवघड असल्याचं दिसून येत आहे. यावर आता शिंदे काय मार्ग काढणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.