औरंगाबाद – राज्यात काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. यावरून विरोधकांकडून सातत्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली जात आहे. परंतु, राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे. राष्ट्रपती राजवट लावली तर राज्यातील जनता पेटून उठेल, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला आहे.
औरंगाबाद येथे प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. जयंत पाटील म्हणाले, विरोधकांचे आता सर्व उपाय संपले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रपती राजवट लावण्याचा डाव रचला जात आहे. परंतु, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर महाराष्ट्रातील जनता पेटून उठेल. ज्यांच्या पुढाकाराने राज्यात हे चालू आहे त्यांच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही विरोधकांच्या या मागणीवर टीका केली आहे. “राष्ट्रपती राजवटीची मागणी करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. त्याची एक कायदेशीर प्रक्रिया आहे. कायद्यानुसार राज्य चालत नाहीत हे दाखवावं लागतं. ते काम राज्यपालांचं असून राज्यपाल काय लिहितील यावर माझा विश्वास आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.