नगर – जोपर्यंत सोनिया गांधी,शरद पवार व उध्दव ठाकरे यांची इच्छा आहे तोपर्यंत महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही. हे सरकार किमान पुढील पंधरा वर्ष टिकेल. देवेंद्र फ डणवीस व चंद्रकांत पाटील यांना भाजपकडून सत्ता गेल्याचे अजूनही पचलेले नाही. त्यातून त्यांना झटके येतात व सरकार पडणार असल्याची बालीश विधाने करतात,असा टोला पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला.
जिल्ह्यातील विविध विकासकामांचा अधिकाऱ्यांकडून आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर मते व्यक्त केली. मुश्रीफ म्हणाले, नगर जिल्हा राज्यात सर्वात मोठा आहे. नगर जिल्ह्याचा पारदर्शक व प्रामाणिक विकास करण्याचा माझा प्रयत्न आहे. विशेषतः नगर शहराच्या विकासाकडे लक्ष देणार आहे.
आजपर्यंत नगर शहराकडे म्हणावे तसे कोणी लक्ष दिले नाही. मी पालकमंत्री झाल्याबरोबर जिल्ह्याच्या विकासासाठी 100 कोटींचा अधिक निधी आणला. जिल्हा व नगर शहरातील महत्चाच्या ऐतिहासिक ठिकाणांचा विकास करण्यात येणार आहे. नगर जिल्हा दुष्काळग्रस्त आहे. वृक्ष लागवडीला मी प्राधान्य देणार आहे. पालकमंत्री दाखवा बक्षीस मिळवा असे माझ्याबाबतीत घडणार नाही,असेही मुश्रीफ म्हणाले.
सन 2019-20 मध्ये 384 कोटींचा निधी जिल्ह्यासाठी मंजूर झाला होता. त्यापैकी 262 कोटी वितरीत करण्यात आले होते. त्यातील 155 कोटी खर्च झाले आहेत. अखर्चित निधी मार्चअखेरपर्यंत खर्च करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मागील वर्षी राज्यातील चार जिल्ह्यांनी सर्व निधी विकासासाठी वापरला,त्यात नगरचे नाव होते. यावर्षीही ते असायला हवे. सन 2020-21 साठी 375 कोटींचा आराखडा करण्यात आला होता. त्यात तब्बल 100 कोटीची वाढ करताना तो 475 कोटी केला आहे.
आघाडी सरकारने कर्जमाफीचा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे.यात नगर जिल्ह्याला सर्वाधिक लाभ झाला आहे. 2 लाख 15 हजार 575 शेतकऱ्यांना 15 कोटी 39 लाख 85 हजार रूपये कर्जमाफीचा लाभ झाला आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक व मनपा आयुक्त लवकरात लवकर नगरला मिळतील.
सरपंच सदस्यातून निवडण्यासाठी कायदा
सरपंच जनतेतून न निवडता सदस्यातून निवडण्यावर महाविकास आघाडी यावर ठाम आहे. याबाबतचे विधेयक मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठविले होते. पण त्यांनी पुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या अधिवेशनात पहिल्याच आठवड्यात या विषयावर विधेयक समंत केले जाईल असा दावा केला.
विखे पण आमच्याकडे येतील
महाविकास आघाडीचे सरकार पुढील किमान पंधरा वर्ष टिकेल असे अ सांगताना त्यांनी खासदार सुजय विखे यांच्याकडे बघत तेही लवकरच आमच्याकडे असतील असे सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. विखे यांनी यावर काही प्रतिक्रिया न व्यक्त करता स्मित हास्य दिले.
इंदुरीकर हे चांगले प्रबोधनकार
इंदुरीकर महाराज यांच्यासंदर्भात सुरु असलेल्या वादाबद्दल पत्रकारांनी मुश्रीफ यांना छेडले असता ते म्हणाले,हा गृहमंत्र्यांच्या अखत्यारित विषय आहे. पण माझ्या मते इंदुरीकर हे चांगले प्रबोधनकार असून त्यांना मी माझ्या मतदारसंघात दोनदा किर्तनाला बोलविले होते.