मुंबई – शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाविकासआघाडीला आज अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी आघाडीने रणनीती आखली आहे. याच पार्श्ववभूमीवर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.
नवाब मलिक म्हणाले कि, भाजप दावा करत होता की ११९ आमदार त्यांच्याकडे आहेत, त्यांचे स्वतःचे १०५ आणि १४ अपक्ष आहेत. त्यांनी ११९ आमदार कुठं आहेत ते दाखवा. भाजपमधील आमदार चलबिचल झाले आहेत. तेथील काही आमदार स्वगृही म्हणजेच काँग्रेस-राष्ट्रवादीत परतण्यासाठी इच्छुक आहेत. आम्ही फोडाफोडीचे राजकारण केले तर भाजप रिकामं होईल, असेही मलिक यांनी म्हंटले आहे. आमचे भाजपला आव्हान आहे की त्यांनी मतविभाजन मागावे. जी प्रथा भाजपने सुरू केली आहे, ती पहिल्यांदा त्यांनी दुरूस्त करावी, असेही त्यांनी सांगितले.
तसेच, भाजप शपथेवर आक्षेप घेत आहे, परंतु तसे झाले तर संसद रिकामी करावी लागेल, असे नवाब मलिक यांनी सांगितले.
दरम्यान, महाविकास आघाडीचा शपथविधी हा बेकायदेशी असल्याचा आरोप भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केला.