मुंबई – शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन करावं, अशी मागणी बंडखोर आमदारांनी केली आहे. तर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत जाणार नसल्याचं सांगत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यातच आज संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, भाजपने युतीत लढल्यानंतर आपला शब्द पाळला नाही. अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचं ठरल होतं. भाजपने शब्द पाळला असता तर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते. हेच उद्धव ठाकरे यांच्या मनात होतं. भाजपने शब्द न पाळल्यानेच एकनाथ शिंदेचे मुख्यमंत्रीपद हुकल्याचं संजय राऊत यांनी नमूद केलं.
शिवसेना-भाजपचा अडीच-अडीच वर्षांचा करार ठरला होता. मात्र भाजपला शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा असं वाटत नव्हत. त्यामुळे युती तुटली. त्यावेळी भाजपने शब्द पाळला असता तर शिंदे मुख्यमंत्री झाले असते. कारण उद्धव ठाकरे यांना कधीही मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. आजचं मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरे यांच्याकडे अनावधानाने आल्याचही राऊत यांनी सांगितलं.
दरम्यान महाविकास आघाडीची स्थापन होत असताना बंडखोर आमदारांनी विरोध का केला नाही, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे. उलट भाजपला सोडा, असं आमदारांनी म्हटलं होतं, असंही राऊतांनी सांगितलं.