मुंबई – शिंदेंसह आपल्याच 16 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांना केली आहे. तसे झाले तर शिवसेनेची एकूण सदस्यसंख्या कमी तर होईलच मात्र सध्या 53 आमदार असलेला राष्ट्रवादी कॉंग्रेस हा महाविकास आघाडीतील सगळ्यांत मोठा पक्ष ठरेल. ज्या पक्षाचे आमदार अधिक त्यांचा मुख्यमंत्री या फॉर्म्युल्यानुसार मग राष्ट्रवादी कॉंग्रेसच मुख्यमंत्रिपदावर दावा करणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या अजय चौधरी यांच्या गटनेते पदाला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मान्यता देण्याच्या निर्णयाला जर सर्वोच्च न्यायालयातून स्टे मिळवण्यास अर्थात स्थगिती मिळवण्यात एकनाथ शिंदे गटाला यश आले तर अगोदर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक लागू शकते. गेल्या दीडवर्षांपासून हे पद रिक्त आहे.
अशा स्थितीत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी अगोदर अध्यक्ष निवडीचा विषय पुढे आणू शकतात. जर एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले तर सरकार पडणार. मात्र त्यासाठी विधानसभेतच मतदानाने सरकार अल्पमतात असल्याचे सिध्द करावे लागेल. आता आपल्याकडे 123 आकडा असल्याचा भाजपचा दावा आहे. मतदानाच्या वेळी तो वाढूही शकतो.