नगर -करोनाचा संकट जाईपर्यत रेड झोन तसेच बाहेरगावातून आलेल्या नातेवाईकाना राजकीय पुढाऱ्यानी घरात आश्रय दिला तर पाच वर्ष निवडणूक लढवून देणार नाही. तसेच आधार देणाऱ्या नागरिकाना सहा महिने ग्रामपंचायतीच्या सर्व सुविधांपासून वंचित रहावे लागेल. असा निर्णय हिंगणगाव ग्रामपंचायत व ग्राम सुरक्षा समितीने घेतला आहे, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी जाधव, सरपंच आबासाहेब सोनवणे यांनी दिली.
नगर जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सुरक्षतेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला या बाबत ठरावही घेण्यात आला आहे. नगर तालुक्यात रेड झोन मधून येणाऱ्या नागरिकाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रात्री अपरात्री नागरिक घरी येतात. शाळेत क्वारंटाईन न होता नातेवाईकांच्या घरी राहतात. नगर तालुक्यात चार करोना पॉझिटिव्ह सापडले आहे. तालुक्यात मुंबई, पुणे येथून येणाऱ्या नागरिकाची संख्या दिवसेन दिवस वाढत आहे. आरोग्य विभाग, ग्रामसुरक्षा समितीला आल्याची माहीत होऊ नये यासाठी घरात लपून बसत आहे. राजकीय पुढारी ही या नातेवाईकांना आश्रय देत असल्याचे प्रकार उघड होत आहे.
गावचे करोनापासून रक्षण करण्यासाठी हिंगणगव येथील ग्रामपंचायत व ग्रामसुरक्षा समितीने महत्वाचा ठराव घेतला आहे. नगर तालुक्यात सोसायटी व ग्रामपंचायतीची निवडणूक आहे. रेड झोन मधून येणाऱ्या नागरिकाना राजकीय पुढाऱ्यानी आश्नय दिला तर येणाऱ्या निवडणुकीपासून वंचित रहावे लागणार आहे. निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रे ग्रामपंचायत कार्यालयातून देण्यात येणार नाही. कागदपत्रे नसल्यामुळे निवडणूक लढवता येणार नाही. तसेच गावातील नागरिकांनी रेड झोन मधून येणाऱ्या नागरिकाना आधार दिला तर सहा महिने ग्रामपंचायत कार्यालयाकडून देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा बंद करण्यात येईल. त्यामुळे ग्रामस्थानाही बाहेर गावातून येणाऱ्या कोणत्याही नागरिकाला पाठीशी घालू नये व घरात आश्वय देऊ नये असे, अवाहन आबासाहेब सोनवणे ग्रामसुरक्षा समितीचे पदाधिकारी यांनी केले आहे.