मुंबई : राज्यात 2234 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर शनिवारी घरी सोडण्यात आले. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 37 हजार 390 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. शनिवारी कोरोनाच्या 2739 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 82 हजार 968 इतका झाला आहे. पैकी सध्या 42 हजार 600 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
शनिवारी झालेल्या मृत्यूपैकी 30 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहे. तर उर्वरित मृत्यू हे 3 मे ते 3 जून या कालावधीत आहे. या कालावधीत झालेल्या 90 मृत्यूपैकी मुंबई 53,मीरा भाईंदर 5, भिवंडी 3, ठाणे 9, उल्हासनगर 6, नवी मुंबई 6, सातारा 2, वसई विरार, अमरावती, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, सोलापूरमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 5 लाख 37 हजार 124 नमुन्यांपैकी 82,968 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 46 हजार 566 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 29 हजार 98 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.