राजगुरूनगर (पुणे) – सर्व पक्षीयांसह प्रत्येक क्षेत्र, नागरिकांच्या माध्यमातून आजही स्व. आमदार नारायणराव पवार (अप्पा) यांचे विचार समाजात रुजवले जात आहेत. त्यांचे नाव तालुक्यात टिकवून ठेवले आहे. अप्पांचे काम, त्यांचे विचार यापुढे कायमच स्मरणात राहतील यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे प्रतिपादन त्यांची कन्या तथा युवक कॉंग्रेसच्या प्रदेश सचिव प्रिया पवार यांनी केले.
स्व. नारायणराव पवार यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्ताने खेड पंचायत समितीमध्ये स्व. आमदार नारायणराव पवार यांच्या प्रतिमेला प्रिया पवार यांच्या हस्ते पुष्पहार अपर्ण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी माजी सभापती अंकुश राक्षे, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपसभापती अमोल पवार, माजी नगरसेवक शंकर राक्षे, राहुल आढारी, काळूसचे माजी सरपंच केशव अरगडे, कालिदास सातकर आदी उपस्थित होते.
अमोल पवार म्हणाले की, तालुक्याच्या राजकारणात स्व. आमदार नारायणराव पवार यांनी तालुक्याच्या जनतेची सेवा केली. हरित क्रांती केली. तीन धरणे बांधली. खेड्यापाड्यातील मुले शिकवीत यासाठी 50 च्या आसपास हायस्कूल सुरू केली. स्थानिक नागरिकांच्या ताब्यात या संस्था दिल्या. सर्वसामान्य माणसांच्या विकासासाठी अप्पांनी काम केले. प्रत्येक नागरिकांच्या मनात अप्पांच्याबद्दल आत्मीयतेची भावना आजही जिवंत आहे. अप्पांचे विचार एकनिष्ठरित्या तालुक्यात यापुढेही रुजवले जातील, असे त्यांनी नमूद केले.
- खेड तालुका कृषि क्षेत्रात अग्रेसर आहे. कृषी क्षेत्रात तालुका पुढे नेण्याचे काम माजी आमदार स्व. नारायणराव पवार यांनी केले. हजारो कुटुंबाला रोजगार मिळवून देणारे ते एकमेव आमदार होते. पुरोगामी विचारांचे राजकारण टिकणे गरजेचे आहे. त्यांनी केलेले पुरोगामी विचारांचे राजकारण तालुक्यात करण्याचा आम्ही प्रयत्न करू.
– अंकुश राक्षे, माजी सभापती, पंचायत समिती, खेड तालुका