पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सायबर फ्रॉडमध्ये फसलेल्या एका १८ वर्षीय तरुणाने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला. त्याने वडिलांना मेसेज पाठवत तीस हजारांच्या खंडणीची मागणी केल्याची बाब उघडकीस आली आहे. यामुळे पोलिस यंत्रणेची मात्र मोठी धावपळ उडाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण शिक्षण घेत असून, तो कात्रजमधील संतोषनगरमध्ये राहात आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजता तो घरातून बाहेर गेला. रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. त्यानंतर रात्री उशिरा या तरुणाच्या मोबाईलवरून फोन आला. फोनवरून शिवीगाळ करीत जर मुलाला जिवंत बघायचे असेल, तर त्याच्या अकाउंटला ३० हजार रुपये टाका, असे म्हणत धमकावले. अकाउंटवर पैसे टाकल्यावर १ तासात मुलाला सोडण्यात येईल.
पोलिसांत तक्रार केली, तर मुलाची अपेक्षा सोडून द्या. एका तासात पैसे आले तर ठिक आहे. अभी गुस्सा मत दिला. तेरे लडके के अकाउंट में पैसे डाल. बहोत हो गया तेरा, अब देख मै क्या करता हूँ, अशी व्हॉटसअप चॅटिंगवरून धमकी दिली. मुलाचे अपहरण झाल्याचे समजताच पालकांनी भारती विद्यापीठ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. मात्र, त्याने सिमकार्ड काढून ठेवल्याने लोकेशन सापडत नव्हते.
दरम्यान, पहाटे त्याने सिमकार्ड टाकल्यावर तांत्रिक तपासात लोकेशन सापडले. त्यात हा तरुण लोणावळा येथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांचे एक पथक लोणावळ्यात पोहोचले. ते तरुणाला पुण्यात घेऊन आले. त्यांनी चौकशी केली असता, त्याने अपहरणकर्त्यांनी मारहाण केल्याचे सांगितले. मात्र, अंगावर मारहाणीच्या खुणा दिसत नसल्याने पोलिसांना संशय आला. त्यांनी सखोल चौकशी केली असता, त्याने मौजमजेसाठी पैशाची गरज असल्याने, तसेच सायबर फ्रॉडमध्ये पैसे गमावल्याने अपहरणाचा बनाव रचल्याची कबुली दिली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कोळी यांनी केली.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रविवारीच खंडणीसाठी एका १२ वर्षांच्या मुलाचे अपहरण झाले होते. पोलिसांनी त्याची कास पठाराच्या जंगलातून सोमवारी सुखरूप सुटका केली. त्यानंतर लगेचच सोमवारी रात्री संबंधित तरुणाच्या अपहरणाची तक्रार प्राप्त झाली. त्यामुळे मात्र पोलीस यंत्रणेची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली होती.