समान पाणी योजनेच्या कामासाठी विचारणा : 50 जण तयार
पुणे – महापालिकेच्या तात्पुरत्या शेल्टरमध्ये राहणाऱ्या मजुरांच्या हाताला लॉकडाऊननंतर काम मिळण्याची शक्यता आहे. शहराच्या समान पाणी योजनेच्या कामासाठी मजूरच नसल्याने हे काम करणाऱ्या कंपनीने या शेल्टरमधील मजूरांना काम देण्याची तयारी दर्शविली आहे. सकारात्मक बाब म्हणजे दोन दिवसांत सुमारे 50 जणांनी या कामासाठी तयारी दर्शविली आहे. त्यामुळे या मजुरांना राहण्याची सोय तसेच हाताला कामही मिळणार आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून महापालिकेच्या 29 शेल्टरमध्ये 1,768 कामगार राहत आहेत. लॉकडाऊनमध्ये हे कामगार बसस्थानक, रेल्वे स्थानक तसेच वाहतुकीच्या सुविधा नसलेल्या भागात अडकले होते. महापालिकेने त्यांची सोय शहरातील समाजमंदिरे, शाळा तसेच पालिकेच्या इमारतींमध्ये सोय केली आहे. तेथे त्यांना सर्व सुविधा पुरवल्या जातात.
या मजुरांमध्ये बांधकाम, रंगकाम तसेच इतर कामे करणाऱ्या मजुरांची संख्या लक्षणीय आहे. तर, दुसऱ्या बाजूला समान पाणी योजनेच्या कामासाठी संबंधित ठेकेदाराकडे पश्चिम बंगालचे मजूर होते. मात्र, लॉकडाऊनमुळे हे मजूर आपल्या गावी परत गेले आहेत. त्यातच आता लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आला असून, काही विकासकामांना पालिकेने परवानगी दिली आहे. त्यामुळे या कंपनीस तसेच पालिकेसही आपल्या काही प्रकल्पांसाठी मजुरांची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने येथील मजुरांना काम करण्याबाबत विचारणा केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तर आणखी काही मजूर तयार असले, तरी त्यांना शहरात राहावे की गावी जावे, याबाबत संभ्रम आहे. दरम्यान, या मजुरांना काम देताना त्यांची सर्व व्यवस्था संबंधित ठेकेदराने करावयाची आहे.