एका चित्रफितीत पाहण्यात आलं होतं की, जगातल्या सर्वांत विचित्र आणि कठिण अशा 12 रस्त्यांपैकी एक असा झोझीला खिंडीचा रस्ता आहे आणि याची प्रचिती लवकरच आम्हाला आली.
झालं! आमच्या परीक्षेचा काळ इथेच सुरू झाला. वाहनांची जी रांग दिसत होती ती सगळी चिखलामुळे अडकलेल्या वाहनांमुळे होती तर. त्यात भरीसभर म्हणजे तिथल्या स्थानिक धनगर लोकांनी आपल्या मेंढ्यासुद्धा तिथे चरायला आणल्या होत्या. म्हणजे इथे गाड्या पुढे सरकताना मारामार आणि त्यात या मेंढ्या हाकलावण्यात अजूनच वेळ जात होता. थोडाफार चिखलाचा रस्ता आम्ही कसाबसा पार केला; पण पुढे गेल्यावर एका ठिकाणी वर छतासारखा डोंगराचा भाग बाहेर आला होता तिथे मात्र ऊन जराही पोचू शकत नसल्यामुळे अक्षरशः चिखलाचा राडा झाला होता. त्यामुळक एका पाठोपाठ गाड्या चिखलात रुतायला लागल्या. मग छोट्या काय आणि मोठ्या काय सगळ्याच गाड्यांच्या चालकांचा कस लागत होता. पहाडी रस्त्यांवर चालवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गाड्यांचा जिथे घाम निघत होता तिथे आमच्या गाडीचे काय? असा प्रश्न मनात येतोय ना येतोय तोच एकाच जागी आमच्या गाडीची चाके फिरायला लागल्यामुळे आम्ही गाडी थांबवली.
ज्या परिस्थितीत आम्ही होतो त्या परिस्थितीत मीहिका (आमची मुलगी) हीचे सोडून आमचे सगळ्यांचेच धाबे दणाणले होते. बालवय नेमकं काय असतं हे तेव्हा मिहिकाची निवांत प्रतिक्रिया पाहून जाणवलं. कारण आई वडील बरोबर असल्यावर चिंता आणि भीती या शब्दांचा अर्थही कळायची गरज नसते. किती सुंदर वय असतं ते खरंच. ती सतत बाबा गाणी लाव, बाबा गाणी का बंद केलीस? आपण इथे का थांबलोय? असले प्रश्न विचारून भांडावून सोडले होते. शेवटी न राहून मी मिहिकावर ओरडले. ते बिचारं लेकरू आईचा अवतार पाहून कडेला गप्प बसून राहिलं मग.
तिला समजावून सांगावं या पेक्षा मलाच आता कुणीतरी सांगा, आता आम्ही यातून कसे बाहेर पडावं, असं मला वाटायला लागलं. ऋषी गाडी रेझ करून पुढे काढण्याचा प्रयत्न करत होता. बरं जास्त वेग ठेवूनसुद्धा चालणार नव्हते. कारण पुढे गाड्या थांबलेल्या आणि शेजारी दरी मगरीसारखं तोंड उघडून उभीच होती जणू. पराग एव्हाना खाली उतरून पुढे काय परिस्थिती आहे हे बघायला गेला होता. दोघेही भाऊ या संकटातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न करत होते. कमीअधिक प्रमाणात आलेली अनेक आव्हाने ऋषीने आर्मीत भरती झाल्यापासून लीलया पेलली होती; पण बाजूला खोल खोल दरी आणि समोर ते अणकुचीदार कडे पाहून तो अस्वस्थ झाला होता नक्कीच. जीवन मरणाच्या या संकटात आपल्यासकट आपल्या कुटुंबाला अडकलेले पाहून तो अशा प्रकारे अस्वस्थ होताना मी प्रथमच पाहत होते. आर्मीचे कठीण प्रशिक्षण घेतलेल्या एका कर्तव्यदक्ष ऑफिसरचे मन आता बापाचे काळीज झाले होते. बापाच्या हृदयाने सैनिकाच्या हृदयावर मात केली होती जणू.
हे सगळे चालू असतानाच निळा शर्ट आणि पांढरी पॅंट घातलेला एक इसम अचानक आमच्याशी बोलायला आला. तो ऋषीला “मै गाडी मे बेठू क्या? मैं गाडी चलाता हूँ. आप लोग उतर जाओ’ असं मुंबईया हिंदीत आम्हाला विचारले. काश्मीरसारखे ठिकाण आणि त्यात आर्मीवाले आम्ही आणि त्यात हा माणूस असा बेधडक येऊन आम्हाला असे काहीतरी विचारायला लागला. अशा वेळी कोणाचीही मदत घेणे योग्य ठरणार नाही, असा विचार करून ऋषीने त्याला “नो थॅंक्स’ म्हटले.आम्ही तो माणूस कुठे जातोय ते पाहत होतो. तो एका तवेरामधे जाऊन बसला. ऋषी गाडी सुरू करून रेझ करत होता आणि पराग आणि दीपा त्यांच्या जमेल तशा शक्तीने गाडी मागून ढकलण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात तो मगाचाच माणूस परत हजर. “मुझे पता है अंजान आदमी से मदत लेना आपको ठीक नहीं लग रहा होगा. लेकिन मैं मुंबई का रेहने वाला ह्ूँ। मै और मेरे कुछ दोस्त इधर घुमने को आये हे। आपके गाडी का नंबर हमने देखा और बोले अरे देख एमएच 12 मतलब महाराष्ट्र के नंबर की गाडी है और तभी हमने देखा की गाडी में एक फॅमिली बैठी है, आप को मुसीबत में देखा तो हमने सोचा आपको मदत की जरुरत है शायद, इसलिये मै वापस आ गया. असं सगळं मुंबईया स्टाइल हिंदीमध्ये एका दमात सांगून त्याने त्याला एकदा प्रयत्न करून गाडी चिखलातून बाहेर काढू देण्यासाठी विनवणी केली. शेवटी एकदा त्याला गाडीचा ताबा दिल्या. आश्चर्य म्हणजे अक्षरशः पुढच्या दहा-पंधरा मिनटांत त्याने गाडी चिखलातून बाहेर काढली.
नुकतच जे काही घडलं होतं त्यावर आमचा कोणाचा विश्वासच बसत नव्हता. असं वाटून गेलं की जणू काही जादूच झालीये आणि सगळं पूर्वस्थितीत आलंय. आता मात्र ऋषीने स्वतःची रीतसर ओळख त्यांना करून दिली. त्या माणसाच्या बोलण्यातून हे समजले की त्यांना वाहन चालवण्याची प्रचंड आवड आहे आणि त्यांना त्याचे उत्तम कौशल्यही अवगत झाले आहे. फिरण्याची आवड असल्याने आतापर्यंत स्वतःच्या किंवा भाड्याच्या गाडीने भारतभर कुठे कुठे त्यांनी प्रवास केलाय. इतकी लीलया गाडी चिखलातून बाहेर काढण्याचा चमत्कार करणे हे अनुभव पाठीशी असल्याखेरीज केवळ अशक्य आहे. तुमचे आभार मानणे खरे तर “थॅंक्यू’ या शब्दाच्या खूपच पलीकडले आहेत असे सांगून आम्ही त्यांचा निरोप घेतला. झोझीला खिंड पार करेपर्यंत त्यांची गाडी आमच्या पुढेच होती. कलियुगाला कितीही नावे ठेवली तरी जगात अजूनही बऱ्यापैकी माणुसकी शिल्लक आहे याची पुन्हा प्रचिती आली.
सफर : सायली वर्तक