नगर -ऊस कारखानदारीचा जिल्हा म्हणून नगर जिल्ह्याची राज्यात ओळख आहे. मात्र, या कारखानदारीचा कणा म्हणून ओळखला जाणारा महत्त्वाचा भाग म्हणजे ऊस तोडणी कामगार होय. मात्र या कारखानदारीच्या उद्योगात कायमच दुर्लक्षीत असलेला कामगार हा त्याच्या न्यायासाठी मजुरीत 50 टक्के वाढ करण्याबरोबरच विविध मागण्यासाठी बेमुदत संपावर जाणार आहे. कामगारांचा संप न मिटल्यास कारखान्यांच्या चाकाला ग्रहण लागण्याची शक्यता असून 1986 सालच्या घटनेची पुनरावृत्ती होणार आहे.
ऊस तोडणी कामगारांसाठी दिल्या जाणाऱ्या मजुरीच्या दरामध्ये पुरेशी वाढ नसल्याने ऊसतोड कामगारांचे नेते थोरे यांच्यासह अन्य संघटनांनी मिळून 1986 ला राज्यात मोठा संप पुकारला, त्यावेळी प्रत्येक किलोमीटरला डोकी सेंटरला 14 रुपये 25 पैसे, गाडी सेंटरला 16 रुपये 25 पैसे, तर टायर बैलगाडीला 19 रुपये 25 पैसे, प्रति टन दर मिळत होता. त्यावर्षी संपाच्या धास्तीने 62 टक्के दरवाढ शासनाला द्यावी लागली. त्यानंतर सातत्याने सन-1989, 1992, 1995 ,1999, 2005, 2009, 2010, 2011, 2014, 2020 या वर्षी ऊसतोड कामगारांचे संप झाले. सध्या ऊसतोड कामगाराला डोकी सेंटरला 273 रुपये, गाडी सेंटरला 304 रुपये, तर टायर बैलगाडीला 304 रुपये प्रति टन व प्रति किलोमीटर ला 14 रुपये टनाला पैसे मिळत आहे.
ऊस तोडणी कामगारांच्या मजुरी बाबतच्या कराराला तीन वर्षे पूर्ण होत आहे. यावर्षी राज्य ऊस तोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियनने ऊस तोडणी कामगाराचा संप पुकारला आहे. सध्या मिळत असलेल्या तोडणी कामगाराच्या दरात 50 टक्के वाढ व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले आहे.
अशा आहेत मागण्या..
मुकादम कमिशन मध्ये दुप्पट वाढ करण्यात यावी., वाहतूक दाराच्या ट्रक, ट्रक्टर मधील दारात दुप्पट वाढ करण्यात यावी., पद्यश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील उसतोडणी कामगार सुरक्षा विमा योजनेची अंबलबजावणी ठरल्याप्रमाणे साखर आयुक्त व साखर संघाने करावी व विम्याची रक्कम रु.5 लाख करावी. तसेच उसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी त्यांच भागात निवासी आश्रम शाळा सुरु करायाव्यात.,केंद्र सरकार कडून उसतोडणी कामगारांच्या तोडणी व वाहतुकी वरील धंद्यावर इन्कमटॅक्स कपात केला जातो, तो कपात करण्यात येऊ नये, नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेला उसतोडणी कामगार उन्नती प्रकल्प संपूर्ण राज्यात राबविण्यात यावा. मुकादम व कामगार यांना शासना कडून ओळख पत्र देण्यात यावे
साखर संघ व उसतोडणी कामगार व युनियन यांच्या मध्ये झालेल्या सामंजस्य कराराची मुदत संपली आहे, मात्र महागाईच्या काळात दरामध्ये काम करणे शक्य नाही. उसतोड कामगार, मुकादम व वाहतूकदार यांच्या अनेक अडचणी असून त्यादृष्टीने बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे.
गहिनीनाथ थोरे, अध्यक्ष, राज्य ऊस तोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियन