कोलकाता – केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळेच देशात आता गव्हाचे संकट निर्माण झाले आहे असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. केंद्रातील सरकार हे भेसळ सरकार आहे अशी टीका करताना त्यांनी म्हटले आहे की मोदी सरकारने नोटबंदी सारखी सदोष धोरणे देशात लादली त्यामुळे महागाई, बेरोजगारीचे संकट उद्भवले. आता त्यांच्याच चुकीच्या धोरणामुळे देशात गव्हाचे संकट उभे राहिले आहे.
केंद्र सरकार आम्हाला गहू देत नाही. त्यांच्याकडे वितरणासाठी गहू नसल्याचे सांगितले जात आहे.संपुर्ण देशभरात गव्हाची टंचाई आहे निर्माण झाली आहे असे त्यांनी म्हटले आहे.बांकुरा जिल्ह्यात तृणमुल कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित करताना त्या बोलत होत्या. केंद्र सरकारने पश्चिम बंगालची आर्थिक थकबाकी माफ केली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.
केंद्राने आम्हाला आमचे पैसे द्यावे अन्यथा आम्ही भाजपला अलविदा म्हणू. तुम्ही राज्यांना पैसे देऊ शकत नसाल तर तुम्हाला या देशावर राज्य करण्याचा अधिकार नाही,असेही त्यांनी यावेळी ठणकाऊन सांगितले.नोटाबंदीनंतर जमा झालेली सर्व रोकड कुठे गेली असा सवालही त्यांनी केला. हा एक मोठा घोटाळा असल्याचा आरोप त्यांनी केला. हे सरकार सर्व सरकारी मालमत्ता विकून देशाचे वाटोळे करीत आहे असा आरोपही ममतांनी केला.