पिंपरी – गेल्या काही दिवसांपासून शहरातील करोना बाधितांच्या संख्येत घट झाली आहे. शहरात सुमारे 20 लाख नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढल्याचे दिसून आले.
तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असतानाच राज्यात करोना नियंत्रणात आल्याचे राज्याच्या विभागाकडून प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या आकडेवारीवरून दिसत आहे. करोना नियंत्रणासाठी लसीकरणावरही भर दिला जात आहे. त्यामुळे नागरिकही थोडे निर्धास्त झाले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातही गेले कित्येक महिने नागरिक घरात बसून होते.
अनेकांचे अजूनही वर्क फ्रॉम होम सुरू आहे. त्यामुळे नागरिक या परिस्थितीतून बाहेर पडू इच्छितात. शहरात लसीकरणाचाही वेगही वाढला आहे. स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव, महापुरूषांची जयंती, पुण्यतिथीनिमित्त अनेक ठिकाणी लसीकरणाचे उपक्रम घेतले जात आहेत. तसेच नगरसेवकांनी पुढाकार घेऊन आपापल्या वॉर्डात लसीकरणासाठी नागरिकांना उद्युक्त केले आहे.
त्यामुळे शहरात पहिला डोस घेतलेल्यांची संख्या सुमारे 20 लाखांवर पोहचली आहे. तसेच शहरातील रुग्णसंख्याही घटली आहे. करोनाचा ओसरता आलेख पाहून नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढली आहे. ते सार्वजनिक ठिकाणी बिनामास्क व सुरक्षेच्या कोणत्याही नियमाचे पालन न करताना फिरत आहेत. नागरिकांनी स्वतःबरोबरच इतरांचाही विचार करून सार्वजनिक ठिकाणी वावरताना सुरक्षेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
फेस्टिव्हलचे वारे आणि होणारी गर्दी
निर्बंध शिथील झाले आहेत. गणेशोत्सवानंतर आता फेस्टिव्हलचे वारे वाहू लागले आहे. शाळाही सुरू झाल्या आहेत. सार्वजनिक बस सेवा सुरळीत सुरू झाली आहे. अनेक कार्यालये नियमित सुरू झाले आहेत. त्यामुळे नागरिक खरेदीसाठी गर्दी करत आहेत. मात्र, सार्वजनिक ठिकाणी वावरताना ते सुरक्षेच्या कोणत्याच नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. शहरातील भाजी मंडई, सार्वजनिक ठिकाणे, विविध सेवा आणि वस्तू पुरविणाऱ्या दुकानांमध्ये त्यांचा बिनधास्तपणे वावर वाढला आहे. ते स्वतःबरोबरच दुसऱ्याच्याही जीव धोक्यात घालत आहेत.
महापालिकेकडून दंड वसुली
नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेकडून सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मास्क न वापरणाऱ्यांना दंड केला जात आहे. नागरिक त्यासही जुमानताना दिसत नाहीत. सार्वजनिक ठिकाणी वावरताना सुरक्षेच्या नियमांचे पालन न करणे, मास्क न वापरणे, विनाकारण घराबाहेर फिरणे, सामाजिक अंतर न पाळणे आदींबाबत महापालिकेने सुमारे पाच कोटींचा दंड वसूल केला आहे.
======================