पिंपरी – ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या प्रशासनाविरोधात आज जनसंवाद सभेत नागरिकांनी सर्वाधिक तक्रारी केल्या. पाणी वेळेवर व पुरेशा दाबाने येत नसल्याने नागरिकांनी आपल्या भागातील समस्या आजच्या जनसंवाद सभेत मांडल्या. तसेच नव्याने ड्रेनेज वाहिन्या टाकणे, सार्वजनिक शौचालये उभारणे, भुयारी मार्गांमध्ये सुरक्षारक्षक नेमणे, बेकायदेशीर वृक्षतोड थांबवून वृक्षारोपण करणे, बंद असलेले जलतरण तलाव सुरु करणे अशा सुमारे 135 नागरिकांनी सहभाग घेऊन तक्रारी आणि सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे 18, 11, 8, 20, 20, 12, 27 आणि 19 नागरिकांनी जनसंवाद सभेत उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले.
नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी आज (सोमवारी) महापालिकेच्या सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा पार पडली. क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभांच्या अध्यक्षपदी मुख्य समन्वय अधिकारी असलेले बीआरटीएसचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, बांधकाम परवानगी विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम, भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, नागरवस्ती विभागाचे उप आयुक्त अजय चारठणकर, सह शहर अभियंता सतीश इंगळे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी होते.
जनतेच्या समस्या
जनसंवाद सभेमध्ये विविध तक्रारी आणि सूचना मांडण्यात आल्या. त्यामध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत सर्वाधित तक्रारी नागरिकांनी केल्या. त्यासोबतच मालमत्ता मालकी हक्काबाबत भोगवटादार म्हणून नाव असल्याने मालकी हक्क देणे, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे, खंडित विद्युत पुरवठा पूर्ववत करणे, रस्त्यांवरील पथदिवे दुरुस्त करणे अशा मागण्या नागरिकांनी केल्या. रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, रस्ता डांबरीकरण करणे, गतिरोधक आणि दुभाजक बसवणे, ड्रेनेज लाइन दुरुस्ती करणे, नव्याने ड्रेनेज वाहिन्या टाकणे, सार्वजनिक शौचालये उभारणे, भुयारी मार्गांमध्ये सुरक्षारक्षक नेमणे, बेकायदेशीर वृक्षतोड थांबवून वृक्षारोपण करणे, बंद जलतरण तलाव सुरू करणे, ओपन जिमची दुरुस्ती, रस्त्याच्या कडेला पार्किंग करण्यात येणाऱ्या गाड्यांमुळे होणारी अडचण दूर करण्याची मागणी केली.