पुणे –महापालिकेची जादा पाणी वापराची चूक झाकण्यासाठी ऐन उन्हाळ्यात शहरात अघोषीत पाणी कपात करण्यात आली. त्याचा पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागत असतानाच; पाण्यासाठी तापलेल्या वातावरणात राजकीय पक्षांकडून निवडणुकांच्या तोंडावर राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरू असल्याची चर्चा आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करत भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी कार्यकर्त्यांची फौज घेऊन महापालिका आयुक्तांच्या बंगल्यावर धडक दिली. त्यानंतर खासदार बापट यांच्या भूमिकेवर राष्ट्रवादी, मनसेने टीका केली. तर, शहरातील पाण्याच्या स्थितीला भाजपसोबत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीही तेवढीच जबाबदार असल्याची टीका “आप’ने केली आहे.
खासदारांनी महापौरांच्या घरचे प्रेशर चेक करावे : राष्ट्रवादी
खासदार बापट महापालिका आयुक्तांच्या बंगल्याचे पाण्याचे प्रेशर तपासणीस गेल्यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी टीका केली. खासदार बापटांना आताच पाणी टंचाई का जाणवू लागली. महापालिकेत भाजपची पाच वर्षे सत्ता होती. तेव्हापासून पुण्याच्या पाण्यात खंड पडत आहे. अनेक भागांत कमी दाबाने पाणी मिळत आहे. ही वस्तुस्थिती खासदारांना सत्ता गेल्यावर लक्षात आली का, अशी टीका काकडे यांनी केली. तसेच, खासदार बापट यांनी महापालिका आयुक्तांसोबतच महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या घरी किती दाबाने पाणी येते हेसुद्धा पहावे, असा टोलाही काकडे यांनी लगावला.
मनसे तपासणार पाण्याचा दाब
शहरातील आमदार, खासदार, पदाधिकारी यांच्या घरी किती दाबाने आणि किती वेळा पाणी येते याचा प्रश्न आता पुणेकरांना पडला आहे. त्यामुळे मनसे पाणी तज्ज्ञांना सोबत घेऊन या पदाधिकाऱ्यांच्या घरचे पाणी तपासणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत कनोजिया यांनी जाहीर केले.
चढाओढ सुरू : आप
भाजप इतकेच पाण्याच्या समस्येला कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादीही जबाबदार असल्याची टीका आपचे जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी केली. समान पाणी योजनेचे काम सुरू केले गेले. त्यावेळी पाणी गळती, असमान पाणी वाटप या सर्वाला तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस जबाबदार होती. त्यानंतर पाच वर्षे पुणेकरांच्या माथी वाढीव पाणीपट्टी मारली. तर, भाजपकाळात या योजनेचे काम संथगतीने झाले. त्यामुळे या योजनेचे खापर कोणावर फोडायचे यावरून भाजप आणि महाविकास आघाडीत चढाओढ सुरू आहे.