नारायणगाव – जुन्नर तालुक्याला हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे यासाठी रविवारी (दि. 10) सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयासमोर सर्वपक्षीय आंदोलन करण्यात येणार असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.
कुकडी प्रकल्प तीन जिल्हे आणि सात तालुक्यांचा असला तरी जुन्नर तालुक्यावर अन्याय होणार असेल तर आम्ही कदापिही सहन करणार नाही; परंतु सुसज्ज नियोजन, शिस्तीचे पालन करून पाण्याची चोरी होणार नसेल तर आम्ही दोन पावले पुढे येण्यास तयार असल्याचे बेनके यांनी सांगितले.
जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी सल्लागार समितीची मंगळवारी (दि. 9) झालेल्या बैठकीत उन्हाळी आवर्तन दोनचे नियोजन करण्यासाठी आमदार अतुल बेनके, रोहित पवार, अशोक पवार, राम शिंदे उपस्थित होते. उन्हाळी दोन चे आवर्तन 1 जूनला सोडणे आवश्यक असतानाही काही आमदारांच्या हट्टामुळे पालकमंत्री व कुकडी सल्लागार समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना अंधारात ठेवून त्या अगोदरच 22 मे रोजी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने या बैठकीत हक्काच्या पाण्यासाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता त्यानुसार हे आंदोलन केले जात आहे.
उन्हाळी आवर्तन दोनचे नियोजन
माणिकडोह 888 एमसीएफटी, पिंपळजोगा धरणातील मृतसाठ्यातून 1.8 टीएमसी, डिंभे धरणातून 1 टीएमसी, वडज धरणातून 50 एमसीएफटी पाणी सोडून कुकडी प्रकल्प चालविणे, घोड व मीना शाखा कालवा व केटीवेअर भरणे असे नियोजन करण्यात आले आहे. माणिकडोह धरणातून 888 एमसीएफटी पाणी सोडल्यास धरणाचा तळ दिसण्याची शक्यता आहे.
सर्वपक्षीय नेते, शेतकऱ्यांना आवाहन
राजकारणविरहित सर्वपक्षीय नेत्यांनी व शेतकऱ्यांनी सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयाजवळ जुन्नर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी होत असलेल्या अन्यायाविरुद्ध एकत्रित येऊन लढा उभा करू. यावेळी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांना निवेदन देण्यात येईल. त्यांनी आपले म्हणणे ऐकले नाही तर सर्वांच्या सहमतीने आंदोलनाची पुढची दिशा ठरविण्यात येईल, असे आमदार अतुल बेनके यांनी नमूद केले.