ग्रामसभेत कोणताही ठराव न घेता परस्पर निर्णय घेतल्याचा सरपंचावर ठपका : ग्रामस्थ संतप्त
चिंबळी – गावाला मुबलक व स्वच्छ पाणी मिळेल या आशेवर गेली कित्येक वर्षे असलेल्या चिंबळीकरांच्या वाट्याला चांगली पाणी योजना येण्याऐवजी हक्काच्या पाण्याचीच वाटणी झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. तर हे हक्काचे पाणी बिल्डरांच्या घशात गेले असून हा निर्णय घेताना ग्रामस्थांना विश्वासात न घेतल्याने ग्रामस्थ संतप्त झाले असून हे पाणी देणाऱ्या सरपंच व संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकारी पी. व्ही. ढवळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पाण्याबाबत आम्हाला माहीत नाही
मंत्रा बिल्डरला पाणी देण्याबाबत आम्हांला काहीच माहीती नसून याबाबतीत विश्वासात घेण्यात आलेले नाही. हा निर्णय घेतल्याचे आम्हाला बाहेरून समजले, अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य पवन पाटारे, आप्पासाहेब बटवाल, गणेश जाधव, समीर जैद यांनी सोमवारी (दि.10) तहकूब ग्रामसभेत दिली.
चिंबळी गावातील सार्वजनिक पाइपलाइनमधून मंत्रा बिल्डर्सच्या गृहप्रकल्पाला अडीच इंची नळ जोड अवैधरित्या दिला आहे. मात्र, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना विश्वास न घेता हा निर्णय घेतला आल्याचा आरोप सरपंचांवर करण्यात आला आहे. या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करून संबंधित सरपंच व संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे निवेदनात नमूद केले आहे. त्याचप्रमाणे गावात अपंग कल्याण निधीतून आलेले बाकडे काही ठिकाणीच बसविण्यात आल्याबाबत देखील निवेदनातून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
या निवेदनावर माजी सरपंच अर्जुन अवघडे, माजी उपसरपंच हेमंत जैद, सोसायटी माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कड, संभाजी अवघडे, ग्रामपंचायत सदस्य समीर जैद, अमोल बहिरट, प्रशांत जैद, दीपक पाटोळे, हिरामण जैद, सागर बहिरट, विकास सोनवणे, तेजस बटवाल, सचिन बहिरट, जीवन बटवाल, विजय बहिरट, संजय खंडागळे, गेनूभाऊ मोरे, दत्तात्रय कड, सागर बटवाल, सूरज बटवाल, आत्माराम बारमुख, सविता पाटोळे, भामाबाई पाटोळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मंत्राला पाणी देण्याबाबत व गावात अपंग कल्याण निधीतून बसविलेल्या बाकड्यांबाबतचे दोन्ही निर्णय अधिकृतच असून यावर ज्यांना आक्षेप आहेत त्यांना पंचायत समिती व जिल्हा परिषदेची दरवाजे उघडी आहेत. बाकी करण्यात आलेले आरोप खोटे असून कुठलीही परवानगी नियमाला सोडून देण्यात आलेली नाही. पीएमआरडीएच्या व शासनाच्या निर्देशानुसार निर्णय घेतला आहे.
– रेश्मा सोनवणे,सरपंच, चिंबळी
मंत्राला पाणी देण्याबाबतचा कोणताही ठराव किंवा निर्णय ग्रामसभेत झालेला नाही.
– पी. व्ही. ढवळे, ग्रामसेवक, चिंबळी