न्हावरे : न्हावरे (ता.शिरूर) परिसरात पुढील चार दिवसांमध्ये चासकमान डाव्या कालव्याचे पाणी येणार आहे.असे शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.
करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शनिवारी (दि.२) शिरूर लोकसभा मतदार संघातील प्रशासनाशी प्रत्यक्ष जाऊन चर्चा केली तसेच आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली.
दरम्यान न्हावरे येथील श्री. मल्लिकार्जुन मोफत भोजन योजनेला आढळराव पाटील यांनी भेट दिली व गावातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांनी चासकमान पाण्याच्या ढिसाळ नियोजनाबाबत आढळराव पाटील यांना विचारले व पाण्याअभावी उन्हाळी पिके तसेच जनावरांचा चारा जाळून चालला आहे असे सांगितले.
पुढे माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले की,चासकमान विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे पाण्याचे ‘टेल टू हेड’ वितरण झालेले नाही.त्याचा फटका टेलच्या भागातील शेतकऱ्यांना बसला असून, न्हावरे, कोकडेवाडी, नीर्वी, कोळगाव डोळस या परिसरात कालव्याचे पाणीच पोहचले नाही.असे संतप्त शेतकऱ्यांनी आढळराव पाटील यांना सांगितले.त्यानंतर आढळराव पाटील म्हणाले की, राजगुरुनगर परिसरात कालव्याला मोठ्या प्रमाणावर गळती असल्यामुळे पाण्याचे आवर्तन बंद करण्यात आले असून, कालवा दुरुस्तीनंतर टेलच्या भागातील शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळणार आहे. त्यामुळे टेलच्या भागातील शेतकरी सुमारे दोन महिन्यांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत आहे.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर कटके, शिवसेना उपजिल्हा प्रमुख पोपट शेलार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर,शिरूर तालुका शिवसेना प्रमुख सुधीर फराटे, न्हावरेचे माजी सरपंच गौतम कदम, माजी उपसरपंच शहाजी पवार,अरुण तांबे,शहाजी खंडागळे,ॲड.महिपती काळे,दीपक कोकडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पाणी मुरते कुठे
चासकमान कालव्याच्या पाण्यामुळे शिरूर तालुक्यात पूर्व आणि पच्छिम भाग असा वाद काही मानाच्या पुढाऱ्यांकडून पेटवला जात आहे. मात्र, याबाबत सर्वस्वी चासकमान प्रशासन विभागच जबाबदार असल्याचे सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. पाणी वाटपाच्या नियमानुसार ‘ टेल टू हेड ‘ असेच पाण्याचे वितरण झाले पाहिजे. अशी मागणी पूर्व भागातील संतप्त शेतकऱ्यांकडून होत आहे.