पुणे – करोनाचा फटका देशातील साखर उत्पादनाला बसला आहे. 28 एप्रिल 2020 पर्यंत साखरेचे उत्पादन 257 लाख टनांहून अधिक झाले असून चालू साखर वर्षात ते 265 लाख टन होण्याची शक्यता आहे. 2018-19 या साखर वर्षात याच कालावधीत 320.15 लाख टन साखरेची निर्मिती झाली होती, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिली.
चालू साखर वर्षात देशातील 456 पैकी 116 साखर कारखान्यांनी 2,372.34 लाख टन उसाचे गाळप याच काळात म्हणजे 28 एप्रिलपर्यंत केले आहे. 2018-19 या साखर वर्षात उसाचे गाळप 2,910.33 लाख टन असे झाले होते. ऊस गाळप व साखर निर्मितीत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटक ही राज्ये आघाडीवर आहे. या तीनही राज्यांचे साखर उत्पादनातील योगदान हे चालू साखर वर्षात 81 टक्के (28 एप्रिलपर्यंत) आहे.