नवी दिल्ली – बॉम्बे डाईंग कंपनीचे अध्यक्ष नुसली वाडिया यांनी टाटा समुहाचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या विरोधात दाखल केलेले सर्व खटले मागे घेतले आहेत. यात त्यांनी टाटांच्या विरोधात लावलेला तीन हजार कोटी रूपयांच्या अब्रुनुकसानीच्या खटल्याचाहीं समावेश आहे. सरन्यायाधिश बोबडे यांनी वाडिया यांना हे खटले मागे घेण्याची अनुमतीही दिली आहे.
कोर्टाने म्हटले आहे की टाटांनी केलेले निवेदन पहाता त्यांचा वाडिया यांची बदनामी करण्याचा हेतू नव्हता असे स्पष्ट झाले आहे, हे निवेदन लक्षात घेऊन तसेच मुंबई हायकोर्टानेही या संबंधात व्यक्त केलेला अभिप्राय लक्षात घेऊन वाडिया यांना हे खटले मागे घेण्याची अनुमती देण्यात येत आहे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. बदनामीच्या खटल्याबाबत टाटा आणि वाडिया यांनी एकत्र बसून आपसातील वाद मिटवावा अशी सुचना सर्वोच्च न्यायालयाने या दोघांनाहीं 6 जानेवारी रोजी केली होती.
सन 2016 मध्ये नसली वाडिया यांना टाटा समुहाच्या संचालक मंडळावरून काढून टाकण्यात आले होते त्यावेळी वाडिया यांनी टाटांना कोर्टात खेचले होते. पण आजच्या निर्णयामुळे या दोन प्रमुख उद्योगपतींमधील वाद आता संपुष्ठात आला आहे.