सातारा – प्रतापगडच्या पायथ्याला अफजलखान कबर परिसरातील अतिक्रमण गनिमी काव्याने काढून शिंदे सरकारने महाराष्ट्रातील जनसामान्याच्या मनातील भावनेला हात घातला आहे. त्यामुळे या सरकारचे अभिनंदन करायला हवे. शिवप्रताप दिन शासकीय पातळीवर सुरू झाला हे सुद्धा एक प्रकारचे अभिनंदनीय यश आहे, अशी कृतज्ञ भावना विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रमुख अवधूत उर्फ बाबूजी नाटेकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष अतुल शालगर, बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष डॉ. रवीकुमार कोठाळे यावेळी उपस्थित होते.
नाटेकर म्हणाले, “”अफजलखानाच्या कबरीचे उदात्तीकरण करून एका आततायी आक्रमकाला संतांच्या रांगेत बसवणे ही समाजाची फसवणूक आहे. या कबरीच्या निमित्ताने अफजलखान प्रकरणाचे होणारे उद्दातीकरण विश्व हिंदू परिषदेला सहन होणारे नव्हते.
म्हणूनच हे जनआंदोलन उभे करण्यात आले. या आंदोलनात भुजंगराव घुगे, मी स्वतः, दीपक गायकवाड, ऍड. जोशी, श्रीकांत पोतनीस, किशोर चव्हाण, अतुल शालगर, रवी कोठाळे, अरविंद कांबळे, शिरीष सरपोतदार, कल्याणी पंडित, गोपाळ शेठ यांनी सहभाग घेतला होता, प्रतापगड उत्सव समितीच्या विजयाताई भोसले, मिलिंद एकबोटे, नंदकिशोर एकबोटे हे सुद्धा आंदोलनात सहभागी होत, असे त्यांनी सांगितले.