लोणावळा – “वरसोली ग्रामपंचायतीला पूर्णवेळ ग्रामसेवक द्या’ या मागणीसाठी वरसोली गावच्या सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांसह या विभागातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी वरसोली ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करीत ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले.
वरसोली ग्रामपंचायतीला गेल्या तीन वर्षात चार हंगामी ग्रामसेवक झाले. पूर्णवेळ ग्रामसेवक मिळत नसल्याने ग्रामपंचायतीच्या विकासकामांना खीळ बसत आहे. प्रत्येक वेळी आलेल्या नवीन ग्रामसेवकाला कामाची माहिती होऊन ते स्थिर होईपर्यंत त्यांची बदली होते, सर्व सदस्यांची याबाबत तक्रार असल्याने वरसोली ग्रामपंचायतीला पूर्णवेळ ग्रामसेवक द्या, अशी मागणी करीत ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकत नवीन ग्रामसेवकांच्या जागी सध्या कार्यरत असलेले ग्रामसेवक यांनाच कायम करा, अशी मागणी करण्यात आली असल्याचे सरपंच सारिका संजय खांडेभराड यांनी सांगितले.
वरसोलीच्या सरपंच सारिका संजय खांडेभराड, जिल्हा परिषद सदस्या कुसूम काशीकर, पंचायत समिती सदस्य महादू उघडे यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. या वेळी उपसरपंच दत्ता खांडेभराड, ग्रामपंचायत सदस्य बबन खरात, अरविंद बालगुडे, विलास चौधरी, मीना शिद, सीता ठोंबरे, अरुणा खांडेभराड, रजनी कुटे, संजय खांडेभराड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
विद्यमान ग्रामसेवक अप्पासाहेब भानवसे चांगले काम करीत असताना त्यांची झालेली बदली रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी मावळचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांच्याकडे केली. गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन ग्रामस्थांची भेट घेत त्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करू, असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामपंचायतीचे टाळे काढत आंदोलन स्थगित करण्यात आले.