लाखणगाव – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील जारकरवाडी गावातील लबडे वस्तीवर बिबट्याने कालवडीवर केलेल्या हल्ल्यात कालवडीचा मृत्यू झाला आहे.
जगन्नाथ कोंडीबा मंचरे यांची दिड वर्षाची ही कालवड असून बिबट्याच्या हल्ल्यात कालवड मृत्युमुखी पडल्याने मंचरे कुटुंबाचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेचा त्वरीत पंचनामा करुन क्षतीग्रस्त कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. जारकरवाडी येथील लबडे वस्ती ही डोंगराच्या कुशीत वसलेली आहे.
डोंगराजवळुन डिंभे धरणाचा कालवा वाहतो आहे. शिवाय जवळच डोंगर व उसाचे क्षेत्रही मोठे असल्याने बिबट्याच्या वास्तव्यास आदर्श परिस्थिती आहे. त्यामुळे बिबट्या अन्नाच्या शोधार्थ थेट मानवी वस्तीत प्रवेश करुन पाळीव प्राण्यांना आपले भक्ष्य बनवतो आहे. या परिसरात नेहमीच बिबट्याचा वावर असल्याने लोक दिवसाही शेतात काम करण्यास घाबरत आहेत. या परिसरातील वनविभागाने त्वरीत पिंजरा लावावा, अशी मागणी सूरज लबडे, मुरलीधर लबडे, गणेश लबडे व जारकरवाडी गावच्या ग्रामस्थांनी केली आहे.