नगर – राष्ट्रवादाचे टोकाचे विचार, उग्र स्वरुप आणि संकुचित विचारसरणी राष्ट्रामधील अराजकतेला निमंत्रण देणारी ठरते. त्यावरच प्राधान्याने प्रबोधनात्मक विचार व्हायला हवेत, अशी भूमिका मुंबई विद्यापीठातील सहायक प्राध्यापक गात्रली लेले यांनी मांडली.
राष्ट्र सेवा दलाच्या ऑनलाईन अभ्यासवर्गात “राष्ट्र, राष्ट्रवाद आणि आताची आव्हाने’ या विषयावर त्यांनी ह वैचारीक मांडणी केली. त्यासाठी महाराष्ट्रातून 95 हून अधिक तरुण सहभागी झाले होते. त्यांना मार्गदर्शन करताना लेले यांनी ही भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, “”राष्ट्रवाद लहानपणापासूनच बिंबवला जातो. चित्रपट, नाटके, पुस्तके यातून त्याची सुरुवात होते. स्पर्धात्मक वातावरण बढावा, एकाच गटाचा विचारधारेचा उदोउदो करणे, कोणताही मुद्दा हार-जीत स्तरावर नेणे, स्वतःची बाजू मोठी करुन मांडणे, विवेक आणि तारतम्याचा अभाव, इतिहास बदलणेचा, विकृत करण्याचा प्रयत्न, चर्चाविश्व बदलून टाकणे इत्यादी मुद्दे त्यात महत्वाची भूमिका बजावतात.
राष्ट्रवाद व्यक्तिनिहाय वेगवेगळे आहेत. महात्मा गांधींचा सर्वसमावेशक, टिळकांचा जहाल, सावरकरांचा हिंदुत्ववाद, राष्ट्रीय कॉंग्रेसचा राष्ट्रवाद, सांस्कृतिक राष्ट्रवाद,नेहरुंचा वसाहतवाद, विस्तारवाद नाकारणारा राष्ट्रवाद, टागोरांचा सर्जनशील राष्ट्रवाद, अशी त्याची स्वरुप असल्याची भूमिकाही लेले यांनी मांडली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संवाद, सहमती आणि सहभाग हे पैलू राष्ट्रवादाला असणे अपेक्षित आहेत. संविधानात्मक मुल्यांसमोर आज आव्हान आहे. राष्ट्रवादावर धर्म लादणे म्हणजे त्याचा संकोच करणे असते. त्यातूनच विनाकारण धार्मिक चष्मा लावून मांडणी सुरु होते. उग्र राष्ट्रवादाचा महिला आणि पुरोगामी चळवळीवर अनिष्ट परिणाम होतो. आपणही गटातटात विभागलेले असणे त्यांचे पथ्यावर पडते. यामुळे सोशल मीडियावर सतत लहानमोठ्या स्वरुपात विस्फोट सुरु असतात. ते थांबणे गरजेचे आहे, असा आग्रह लेले यांनी धरला आहे. राष्ट्रवाद कोणती मुल्ये धारण करतो, त्यावर तो नागरिकांची गरज आहे कि नाही हे ठरवता येईल. हिटलरचे काळातील कट्टरतावादाचे उच्चतम टोक आता परत दिसत आहे. सांप्रदायिक सद्भावनाच धोक्यात आहे. धार्मिक सलोखा सैल होत आहे. अल्पसंख्याक असुरक्षित फिल करत आहेत, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली