कोल्हापूर – कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत भाजपाच्या पायाखालची वाळू घसरत चालली आहे. निवडणुकीत मूळ मुद्दा बाजूला ठेवायचा आणि लोकांचे लक्ष विचलित करायचे ही भाजपची निती आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या सभेवर दगडफेकीचा प्रकार हा स्टेज मॅनेज आहे. स्टेज मॅनेज करुन कोल्हापूरकरांची सहानुभूती मिळणार नाही. मुळात असला प्रकार येथील नागरिक सहन करणार नाहीत. ‘असा पलटवार पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला.
भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या मुक्त सैनिक वसाहत येथे रविवारी रात्री झालेल्या सभेवेळी दगडफेक झाली. असा आरोप वाघ यांनी केला आहे. वाघ या सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. वाघ यांनी प्रचार सभेत पालकमंत्री सतेज पाटील हे निष्क्रिय मंत्री आहेत असा टोला लगाविला होता. पालकमंत्री पाटील यांनी सोमवारी दुपारी पत्रकार परिषद घेत वाघ यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे म्हटले आहे.
“जिल्हा पोलिस प्रमुखांना या प्रकाराची चौकशी करायच्या, सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या सूचना केल्या आहेत. दगडफेकीचा प्रकार म्हणजे कोल्हापूरला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. आम्ही अशा प्रकाराने विचलित होणार नाही.उत्तरच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार बहुमताने निवडून येणार, असे ते म्हणाले.
चित्रा वाघ यांनी राजकारण जरुर करावे पण पोलिसांचे खच्चीकरण होईल असे वक्तव्य करू नयेत. भाजपची प्रत्येक सभा लाइव्ह असते मग मुक्त सैनिक वसाहतमधील सभा का लाइव्ह नव्हती ? येथून पुढे अशा कोणत्याही घटना घडू नयेत म्हणून भाजप नेत्यांच्या सभेला जादा सुरक्षा पुरवा अशा सूचना केल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
“वाघांच्या अनेक भानगडी आहेत. अटक टाळण्यासाठी ते भाजपात गेल्या आहेत. शिवाय मी निष्क्रिय आहे की नाही हे 12 तारखेला जनता ठरवेल. ‘असेही पाटील म्हणाले.
विरोधंकाकडून मतदारांना पेटीएमद्वारे पैसे पाठविण्याचा प्रकार होवू शकतो. या प्रकाराची ईडीमार्फत चौकशी होईल या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आरोपावर बोलताना “ईडी ही स्वतंत्र यंत्रणा नाही का ? चंद्रकांत पाटील व माजी खासदार धनंजय महाडिक हे वेगवेगळी विधाने करत एका अर्थी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत करत आहेत.’ असे पाटील म्हणाले.