बीड – चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कारच्या धडकेत तीघांचा मृत्यू झाला असून चौघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे घडली. सौरभ सतीश गिरी (वय 19), लहू बबन काटुळे (वय 30), रमेश विठ्ठल फुलारी (वय 45) अशी अपघातात मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाईहून नातेवाईकांचा अंत्यविधी उरकून कार चालक अलिम शेख आणि दीपक वैजनाथ राजारोशे कारमधून अहदपूरकडे परत जात होते. कार चालकाचा ताबा सुटल्याने नवाबवाडीकडे जाणाऱ्या दुचाकीस कारने समोरुन जोराची धडक दिली. त्यानंतर घटनांदूर येथे मुख्य चौकात उभे असलेल्या चौघांना कारने जोराची धडक दिली. या घटनेत सौरभ गिरी, लहू काटुळे हे जागीच ठार झाले. तर रमेश फुलारी यांना उपचारासाठी लातूरला घेऊन जात असताना रस्त्यामध्ये मृत्यू झाला.
या अपघातात कार चालक अलिम शेख (वय25), दीपक वैजनाथ राजारोशे (वय 35, रा.अहमदपूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघात एवढा भीषण होता की कारच्या धडकेने लोखंडी खांब उपटून खाली पडला. कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे रस्त्यालगत उभ्या असलेल्या तिघांचा अपघातात मृत्यू झाला. घाटनांदूर गावात शोकाकुल वातावरणात संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अपघातात मृत्यू पावलेले लहू काटूळे हे ऑटोरिक्षा चालक होते. त्यांच्या पश्चात आई, वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे. तर रमेश विठ्ठल फुलारी यांचा फुलाचा व्यवसाय होता. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगी, दोन मुलं असा परिवार आहे. तर सौरभ सतीश गिरी यांचा शेळीपालनाचा व्यवसाय आहे. एकाच गावातील सर्वसामान्य कुटुंबातील तिघांचा अपघाती मृत्यू झाल्याने अंबाजोगाईत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.