पीएमआरडीएचा रस्ता वाहनतळ : प्रवाशांचे अतोनात हाल : खासगी कंपन्यांकडून नियमाला तिलांजली
केंदूर -पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील हद्दीतील आणि भारतगॅस फाटा ते एल ऍण्ड टी फाटादरम्यान रस्त्याच्या बाजूला मोठे ट्रक पार्किंग केले जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना या अवैद्य वाहनतळाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक आणि प्रवासी मेटाकुटीला आले आहेत.
एलएनटी फाटा ते करंदी- भारत गॅस फाटा हा अनेक वर्षे रखडलेला रस्ता पीएमआरडीएच्या माध्यमातून पूर्ण झाला आहे. त्यामुळे शिक्रापूरमध्ये होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे. चाकण रोडने येणारे प्रवासी शिक्रापूरकडे न जाता एलएनटी फाट्यावरून थेट पुण्याच्या दिशेने जाऊ लागले. मात्र, या रस्त्याच्या दुतर्फा अनेक कारखाने आहेत. कारखान्यामध्ये कच्चा, पक्का माल वाहून नेण्यासाठी मोठ्या कंटेनरचा वापर केला जातो.
गाडी भरण्यासाठी किंवा खाली करण्यासाठी बाहेरून आलेल्या कंटेनर चालकांना काही तास प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे रस्त्यालगत असणाऱ्या एका कंपनीच्या गेटसमोर रोजच पाच ते दहा मोठे कंटेनर प्रतीक्षेत उभे असतात. रस्त्याच्या बाजूला उभे राहणाऱ्या कंटेनरसाठी कंपनी व्यवस्थापनाने वाहनतळाची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
मात्र, कंपनी प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. हे मोठे ट्रक रस्त्याच्या दुतर्फा उभे असतात. त्यामुळे रस्त्याने ये- जा करणाऱ्या प्रवाशांना नाहक वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. दुतर्फा ट्रक असल्याने एकाचवेळी सामोरासमोर दोन गाड्या रस्त्याने येऊ जाऊ शकत नाही. येथे जनावरांची देखील मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
एका कंपनीसमोर रस्त्याच्या कडेला ट्रक उभे असतात. या कंपनी व्यवस्थापनाला अनेकवेळा परिसरातील नागरिकांनी अशाप्रकारे ट्रक उभे न करण्याची विनंती केली आहे. मात्र, या विनंतीला कंपनीचे अधिकारी गंभीर दखल घेत नाही. याठिकाणी दुर्घटना घडली तर याची जबाबदारी कंपनी प्रशासन घेणार का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.