नवी दिल्ली – ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या प्रकरणावरून आंदोलन करत असलेल्या भारतीय कुस्तीपटूंना मिळत असलेली वागणून अत्यंत लाजीरवाणी आहे, असे ताशेरे जागतिक कुस्ती महासंघाने लगावले आहेत. भारतातील केंद्रीय यंत्रणा या कुस्तीपटूंकडे दुर्लक्ष करत आहे व त्यामुळे केवळ या खेळाचीच नव्हे तर संपूर्ण देशीा प्रतिमा मलिन होऊ शकते, असेही जागतिक महासंघाने म्हटले आहे.
लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या ब्रिजभूषण यांच्यावर खटले दाखल होऊनही त्यांना अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळेच हे कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. मात्र, भारतीय केंद्रीय यंत्रणेतील कोणीही व्यक्ती त्यांची साधी भेटही घेऊ शकलेला नाही.
अशा स्थितीत या खेळाडूंचे भविष्य काय, असा सवालही जागतिक महासंघाने केला आहे. दरम्यान, इंडिया गेट जवळील कुस्तीपटूंच्या उपोषणाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आता कुस्तीपटू काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
निलंबनाचा इशारा
भारतीय कुस्ती महासंघाने येत्या 45 दिवसांत निवडणुका घेत नवे पदाधिकारी नियुक्त केले नाहीत तर भारतीय कुस्ती महासंघाला आम्ही निलंबित करू, असा इशाराही जागतिक महासंघाने दिला आहे. तसेच निलंबन कालावधीत होत असलेल्या सर्व स्पर्धांमध्ये भारतीय कुस्तीपटूंना वेगळ्या ध्वजाखाली खेळावे लागण्याची नामुष्कीही पत्करावी लागेल, असा सज्जड दमही जागतिक महासंघाने दिला आहे.
…आणि कुस्तीपटू झाले निरुत्तर
देशासाठी मिळवलेली पदके पवित्र गंगा नदीत अर्पण करण्यासाठी हरिद्वारला दाखल झालेल्या कुस्तीपटूंनी आपला निर्णय बदलला व सरकारला पाच दिवसांचा अल्टिमेटम दिला. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर इंडिया गेटवर आमरण उपोषण सुरू करू, असा इशाराही या कुस्तीपटूंनी दिला.
मात्र, आतापर्यंत विविध पक्षांचे अनेक नेते तुम्हाला भेटले; परंतु तुम्ही कोणाचेच ऐकले नाही मग शेतकरी संघटनेचेच कसे काय ऐकले व पदके प्रवाहित करण्याचा निर्णय मागे घेतला, असा प्रश्न एका माध्यमाच्या प्रतिनिधीने विचारल्यावर हे कुस्तीपटू निरुत्तर झाले.