ग्रामस्थांकडून मद्यधुंद चालकाला चोप, पोलिसांच्या दिले ताब्यात
ओतूर – सकाळी नऊची वेळ, नगर- कल्याण महामार्गावरून आलेल्या स्कूलबसने आडव्या- तिडव्या गिरक्या घेतल्या. त्याचवेळी स्थानिक ग्रामस्थांनी दुर्घटनेची खूणगाठ बांधली. आणि क्षणाचा विलंब न करता स्कूल बस तात्काळ रोखून धरली. त्यामुळे बसमधील 16 चिमकुल्यांचे जीव केवळ ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे वाचले. जीवाचा थरकाप उडविणारी घटना डिंगोरे (ता. जुन्नर) येथील एसटी बसस्थानकानजीक घडली.
मद्यधुंद चालकाला संतप्त नागरिकांनी चोप देत ओतूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. बसचालक आशुतोष विलास जगताप (रा. उदापूर, ता. जुन्नर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती ठाणे अंमलदार विकास गोसावी यांनी दिली आहे.
डिंगोरे येथील एसटी बसस्थानकानजीक बुधवारी (दि.4) सकाळी स्कूल बस नगर-कल्याण महामार्गावरून वेगाने गिरक्या घेत आली. डिंगोरे ते बल्लाळवाडी गावाकडे जाताना बेफिकीरपणे वेगात वळण घेताना रस्त्याकडेलाच असलेल्या मोठ्या खड्ड्यात उलटण्यापूर्वीच हॉटेलजवळ उभ्या असलेल्या ग्रामस्थांना बसचालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचे लक्षात आले.
सतर्क ग्रामस्थांनी स्कूल बसच्या पुढे धावत जाऊन बसचालकाला दरडावून गाडी थांबविण्यास भाग पाडले. प्रसंगच इतका बाका होता की, गाडी थांबविण्यास एक क्षण जरी उशीर झाला असता तर ती बस खड्डयात उलटली असती. जवळच महावितरणचा इलक्ट्रिक डीपीही होता. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे बसमधील 16 चिमुकल्यांचे प्राण वाचले.
चालकाला बसमधून उतरविण्यात आले असता त्याने मद्यपान केल्याचे आढळले. त्यामुळे संतप्त स्थानिक नागरिकांनी त्याला बेदम चोप दिला. त्याची दारूची नशा कमी करण्यासाठी त्याला कोरा चहा पाजण्यात आला. विद्यार्थ्यांना बसमधून सुरक्षितपणे खाली उतरविण्यात आले. यानंतर पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. अंगावर शहारे आणणारी घटना गावभर समजल्यावर हजारोंच्या संख्येत स्थानिक लोक घटनास्थळी जमा झाले. त्यातील बहुतेकांनी ओतूर पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने घटनास्थळ गाठून लगोलग चालकाला ताब्यात घेतले. घटनास्थळी मोठ्या संख्येने संतप्त जमाव जमला होता. यावेळी वातावरण चिघळू नये, यासाठी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, माजी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बबनराव तांबे यांनी शांततेचे आवाहन केले.
स्कूलबस ही (एमएच 14 सीडब्ल्यू 2429) ही ओतूर येथिल इंग्लिश मीडियम स्कूलची आहे. बसमध्ये उदापूर, डिंगोरे, आमले शिवार, बल्लाळवाडी परिसरातील 16 विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी गोळा करण्यात आले होते.
दरम्यान, याबाबत शाळा प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी नेहमीचा चालक आजच्या घटनेवेळी रजेवर असल्यामुळे त्या गाडीवर बदली चालक देण्यात आला असल्याबाबत सांगितले. आपल्या मुलांचे प्राण वाचविणाऱ्या डिंगोरे ग्रामस्थांचे विद्यार्थ्याच्या पालकांनी मनोमन आभार मानले.
डिंगोरे येथील उद्योजक विश्वासराव आमले,बच्चू आचार्य, संपत खरात, सतीश मंडलिक, बबन शिंगोटे, संदीप शिंगोटे, मकरंद लोहटे, शिवाजी शेरकर, अकबर इनामदार, संतोष मवाळ, बन्सी शेख, संतोष आमले,पांडुरंग बनकर आदी ग्रामस्थांची या दुर्घटनेत मोलाची मदत झाली.