नवी दिल्ली – उत्तर प्रदेशसह देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी 4 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशात भाजपने 270 चा टप्पा ओलांडला आहे. भाजपने स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. यावरून मोदींची लाट देशात कायम असल्याचं अधोरेखित झालं. त्यातच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर परिणाम होणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यात काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी भुवया उंचावणारं विधान केलं आहे.
महाराष्ट्रातील सरकार पडण्याची शक्यता आहे का, या प्रश्नवार भीती वाटते का असा प्रश्न चर्चेवेळी केतकरांना विचारण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणाले ज्या क्षणापासून हे सरकार स्थापन झाले आहे त्या क्षणापासूनच ही भीती आहे की महाराष्ट्रातले सरकार केव्हाही पडू शकतं.
तत्पूर्वी महाराष्ट्रात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील सरकार कोसळणार असं विधान केलं होतं. पाटील यांनी 10 मार्चनंतर हे होईल, असंही म्हटलं होतं. त्यातच केतकरांनी केलेलं विधान चर्चेचा विषय ठरत आहे.