जयपूर – जमिनीच्या वादातून मंदिराच्या पुजाऱ्याला जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना राजस्थानमध्ये घडली. त्या पुजाऱ्याचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
राजस्थानच्या करौली जिल्ह्यातील एका गावात असणाऱ्या मंदिराच्या जमिनीवरून वाद निर्माण झाला होता. एक गट ती जमीन बळकावू पाहत होता. त्यातून बुधवारी पाच आरोपींनी मंदिराचे पुजारी बाबूलाल वैष्णव यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. त्या घटनेत वैष्णव गंभीर भाजले.
त्यांना उपचारासाठी जयपूरमधील रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचे गुरूवारी रात्री निधन झाले. वैष्णव यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कैलाश मीना याला पोलिसांनी अटक केली. दरम्यान, पुजाऱ्याच्या हत्येचा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.
दोषींना कठोर शिक्षा करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. मात्र, पुजाऱ्याच्या हत्येवरून भाजपने राजस्थानमधील कॉंग्रेस सरकारवर टीकेची झोड उठवली. कॉंग्रेसच्या राजवटीत राजस्थानमधील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती ढासळल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला.