पुणे – यंदाच्या मान्सून परतीचा प्रवास राज्यातून लवकरच सुरू होणार आहे. त्यापूर्वी पाऊस हजेरी लावतो. त्यापूर्वी हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यात “यलो अलर्ट’ जारी केला आहे. यामुळे अनेक भागांत विजा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मागील आठ दिवसांपासून राज्यात पावसाने उघडीप दिल्याने ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढला होता. यामुळे राज्यातील बहुतांश शहरांच्या कमाल तापमानाचा पारादेखील 33 अंश सेल्सिअसच्या पुढे होता. मात्र, साधारण 13 ऑक्टोबरपर्यंत पाऊस हजेरी लावणार असल्याने कमाल आणि किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
राज्यातील पुण्यासह कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद आदी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
काही जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.