मुंबई – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा काल निकाल जाहीर झाला. यावेळी निकालात कोर्टाने राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. तसेच शिवसेना पक्षाचे प्रतोद म्हणून शिंदे गटाचा पाठिंबा असणारे भरत गोगावले यांची नियुक्ती करण्याचा सभापतींचा निर्णय बेकायदेशीर असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. यानंतर दोन्ही गटातील नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहे. यातच ‘सामना’ अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे.
सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड यांनी दिलेल्या निकालानंतर ‘सामना’तून आभार व्यक्त करण्यात आले आहे. ‘सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे ऋण लोकशाही, संसदीय व्यवस्था विसरू शकणार नाही. राजकारण्यांनी केलेल्या लबाडीवर त्यांनी परखड भाष्य केले, ते दबावाला बळी पडले नाहीत.’
‘सरकार येईल आणि जाईल, राजकारणातले चढ-उतार येतच राहतील, पण देशाचे संविधान व न्याय व्यवस्थेत आजही ‘चंद्रचूड’ आहेत, न्याय मेलेला नाही हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने दाखवून दिले. सरन्यायाधीश चंद्रचूड हे रामशास्त्री बाण्यानेच वागले व बेडरपणे त्यांनी जे निकालपत्र वाचन केले त्यातून एक स्पष्ट झाले ते म्हणजे, राजकारण, सत्ताकारण, घटनात्मक संस्था मारल्या असतील, पण न्याय मेलेला नाही !’ असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
पुढे यात शिंदे- फडणवीस सरकारवर टीका करण्यात आली आहे. ‘शिंदे व त्यांच्या फुटीर गटाचे अंतर्वस्त्रही सर्वोच्च न्यायालयाने उतरवले, तरीही ‘जितंमय्या’च्या आवेशात ते नाचत असतील तर तो त्यांचा प्रश्न! जेव्हा अंतःकरण भरून येते तेव्हा आपल्या मनातील भावना आणि कल्पना व्यक्त कराण्यास शब्द अपुरे पडतात. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या बाबतीत जो निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने दिला त्या निर्णयाचा आम्ही आदर करतो.’
‘महाराष्ट्रातील शिंदे सरकार बनवताना संसदीय संकेत, सरकारी यंत्रणा, राज्यपाल, घटनात्मक तरतुदी असे सर्व काही पायदळी तुडवले गेले. आता सर्वोच्च न्यायालयाने परखडपणे सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा स्वखुशीने दिला. त्यांनी राजीनामा दिला नसता तर मुख्यमंत्रीपदावर त्यांची पुनर्स्थापना करणे शक्य झाले असते. हे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. याचाच अर्थ आजचे मुख्यमंत्री व त्यांचे सरकार बेकायदेशीर ठरले आहे.’