सोमेश्वर परिसरात आकाशाकडे नजरा खिळल्या; उठल्या वावड्या
– तुषार धुमाळ
वाघळवाडी – सोमेश्वर मंदिर करंजे येथील परिसरात दुपारी 11:30 ते 12:30 वाजता सूर्याभोवती पडलेले खळे पाहायला मिळाले. श्रावणी सोमवारीच (दि.26) हे खळं पाहायला मिळाल्याने येथील मंदिरात आलेल्या भाविकांसाठी ही पर्वणी ठरली. परंतु, येथेही काही जणांकडून श्रद्धा अन् अंधश्रद्धाच्या वावड्या उठल्या. परंतु, यामागे खगोलीय कारणे असल्याचे काही जाणकार सांगत होते.
सोमेश्वर करंजे परिसरात दुपारी कडक ऊन होते. त्यावेळी अचानक आकाशात ढग जमून आले, त्यावेळी सर्वांच्या नजरा एकामागून एक आकाशाकडे वळल्या. तर, त्यावेळी सूर्याभोवती रिंगण (खळं) पडल्याचे दिसू लागले. हे खळे आकाशात बराच वेळ असल्याने याची चर्चा तालुकाभर पसरली होती. यामुळे बऱ्याच तर्कवितर्कांना उधाण आले होते.
यामुळे या मागचे खगोलीय कारण जाणून घेण्याकरीता कोल्हापुरातील खगोलशास्त्र अभ्यासक डॉ. प्रा. मिलिंद मनोहर कारंजकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, सूर्याभोवताली पडणारे खळे हे फिजिक्समधील ऑपटिक्सचा भाग आहे. सूर्या भोवतालचे खळं किंवा रिंगण, हा प्रिझममधून किरणे गेल्यानंतर जसे सप्तरंग दिसतात, तसाच हा प्रकार आहे. सूर्याभोवतीच्या खळ्यास इंग्रजीमध्ये हेलो (Halo) असेही म्हणतात. हॅलो यास मराठीमध्ये इंद्रधनुष्याचे प्रभामंडळ असे म्हंटले जाते.
वादळ आल्यानंतर आकाशामध्ये जवळजवळ 20 हजार फुटावर सिरस नावाचे ढग तयार होतात. या ढगामध्ये लाखोंच्या संख्येने लहान लहान बर्फाचे क्रिस्टल्स असतात. या क्रिस्टल्समधून सूर्याची किरणे गेल्यानंतर त्या किरणांचे रिफ्लेक्शन किंवा रिफ्रॅक्शन किंवा स्पिल्टिंग होते. यातूनच सूर्याभोवती रिंगण किंवा खळे पाहायला मिळते. यामध्ये बर्फाचे तुकडे हे प्रिझमप्रमाणे काम करतात. पाण्याचा रिफरॅक्टिव्ह इंडेक्स 1.33 आहे. पाणी हे द्रव स्वरूपात आहे तर बर्फ हा घन पदार्थ आहे. हवेतून सर्याचे किरण जेव्हा घन पदार्थातून जातात. तेव्हा माध्यम बदलते.1.33 रिफरॅक्टिव्ह इंडेक्समधून गेल्यानंतर या किरणांचे वक्रिकरण होते, यातून हे खळे दिसते. या गोलाची त्रिज्या 22 अंश डिग्री इतकी असते. यामध्ये या गोलाच्या आतील बाजूस लालरंग दिसतो तर बाहेरच्या बाजूस निळा रंग दिसतो. हे खळे फक्त सूर्या भोवतीच दिसते, असे नाही तर चंद्राभोवतीही दिसत असते, असेही डॉ. प्रा. कारंजकर यांनी सांगितले.
सुर्याभोवती पडणाऱ्या खळ्यामागे खगोलीय कारण असते. परंतु, ग्रामीण भागातील शेतकरी यामागे दुष्काळ पडणार, पाणी टंचाई होणार यासह अनेक चुकीचे अंदाज लावून मोकळे होतात. असे न करता सर्वांनीच अशा घटनांमागील शास्त्रीय कारणे शोधणे गरजेचे आहे.
– डॉ. प्रा. मिलिंद मनोहर कारंजकर, खगोलशास्त्र अभ्यासक, कोल्हापूर