खेळाडूंना धोक्यात ठेवून स्पर्धेचा अट्टहास
पुणे – अमिरातीत आयपीएल स्पर्धेचे पडघम वाजू लागलेले असतानाच ज्या गोष्टींची चिंता वाटत होती नेमके तेच घडले. स्पर्धेतील प्रमुख संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघातील एक खेळाडू व सपोर्ट स्टाफमधील बारा सदस्यांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले. अफाट पैसा बुडेल म्हणून खेळाडूंच्या जीवाशी खेळ करत ही स्पर्धा खेळविण्याचा बीसीसीआय व आयपीएल समितीचा हा अट्टहास कशासाठी, असा प्रश्न एकीकडे निर्माण झालेला असताना बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर स्पर्धेला कोणताही धोका नसल्याचे सांगून बीसीसीआय व खेळाडू देखील पैशांसाठी कोणत्या थराला जात असल्याचेच मत व्यक्त केले आहे.
मार्च महिन्यापासून जगभरात करोनाचा धोका पसरला व त्यामुळे अन्य क्षेत्रांप्रमाणेच क्रीडाक्षेत्र देखील ठप्प झाले. त्यावेळी त्या महिन्यातच आयपीएल स्पर्धा होणार होती. मात्र, करोनाच्या धोक्यामुळे ती लांबणीवर टाकण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानला पीएसएल स्पर्धा तसेच आशिया करंडक स्पर्धा रद्द करायला भाग पाडले गेले. तसेच या स्पर्धा श्रीलंकेतही होऊ नयेत यासाठी बीसीसीआयने पडद्यामागे खेळ केला.
इतकेच नाही तर ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळावर दबाव टाकून टी-20 विश्वकरंडकही रद्द करण्याचा निर्णय घ्यायला आयसीसीलाही भाग पाडले. इतक्या सर्व गोष्टी केल्यानंतर आखाती देशात करोनाचा धोका फारसा नसल्याने अमिराती क्रिकेट मंडळाने दिलेला प्रस्ताव स्वीकारून तिथे ही स्पर्धा येत्या 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होणार असल्याचे जाहीर केले.