हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – हिगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील दोन दिव्यांगांनी अनेक संकटे झेलून धडधाकटांना लाजवेल असा संघर्ष केला आहे. आता ते स्वतः काम करून आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करताहेत आणि आपल्या कार्यातून इतरांनाही प्रेरणा देताहेत.
गोरेगाव येथील भागवत पवार आणि संजय कावरखे हे दोघे बालपणीचे मित्र. भागवत हे बारावी तर संजयचे नववीपर्यंत शिक्षण झाले. यानंतर त्यांनी अंगावर पडेल ते काम केले. नंतर नाशिक येथे सायकल दुरुस्तीचे दुकान टाकले जे तब्बल सतरा वर्ष चालवले. पण परिस्थितीला त्यांचे हे सुख पहावत नव्हते कि काय कोण जाणो अन् त्यांचे दुकान अतिक्रमणात गेले.
त्यानंतर पवार यांनी थेट गावचा रास्ता धरला. गोरेगावात आल्यावर काम मिळत नव्हते म्हणून पुणे गाठले. तेथे इंजीन बनविणाऱ्या कंपनीत काम सुरू केले. मात्र तेथेही पवार यांचा अपघात झाला. तीन महिन्यांनी हॅण्डग्लोव्हज् असणारे हात मशीनमध्ये ओढले गेले. यात डाव्या हाताची चार बोटे निकामी झाली, कंपनीने दवाखान्यात नेले. पण, हाताला काम नव्हते. त्यामुळे ते घरी परतले.
पुणे येथे उपचारासाठी पायपीट केली. तेथे हातावर मोठी शस्त्रक्रिया झाली. पोटाचे मांस काढून हाताला लावले. त्यानंतर पुन्हा अपघात झाला. सहा महिने अंथरुणाला खिळले. डोक्यावर कर्ज झाले.यातून बहेर पडण्यासाठी गोरेगाव येथील बसस्थानक परिसरात मोटार दुरुस्ती व टायर विक्रीचे दुकान थाटले. एक वर्षात तेही जळाले अन् तीन ते चार लाखांचा फटका बसला.
पावलापावलावर सुरु असलेला संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला होता. अशात पवार यांनी पुन्हा इतरांच्या मदतीने नवा व्यवसाय थाटला यावेळी त्यांच्या मदतीला पायाने दिव्यांग असलेला बालपणीचा मित्र संजय कावरखे देखील धावून आला.
कष्टाळू संजय कावरखे
वयाची तीन वर्षे असताना पोलिओ झाला अन् संजय कावरखे यांचे दोन्ही पाय निकामी झाले. तर भागवत यांचा एक हात निकामी. मग दोघांनी एकत्र येऊन हा नवा व्यवसाय थाटला. दोघेही आता पेट्रोल पंप, दुचाकी, इंजीन, गॅस शेगडी, स्पीकर, तीन चाकी, चारचाकी, दुचाकीची कामे करतात. इंजिनात कितीही बिघाड असो दुरुस्ती हमखास करतात.
पवार यांचा एक मुलगा बारावी शिकला असून, आयटीआय करून एका कंपनीत काम करत आहे. तर.कावरखे यांना एक मुलगी असून, ती सातव्या वर्गामध्ये शिक्षण घेते.
भागवत यांच्यावर पाच शस्त्रक्रिया
भागवत यांच्यावर एक-दोन नव्हे तर, तब्बल पाच शस्त्रक्रिया झाल्या. एकदा रुग्णालयात जाताना बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात पवार यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली. दात पडले, चेहरा विद्रूप झाला. ज्यूस खरेदी करण्यापुरतेही पैसे मिळत नव्हते यामुळे वरणाचे पाणी काढून ठेवत पत्नी सेवा करायची. कुठूनतरी ताक मागवून आणून त्यावर गुजराण करावी लागायची.
भागवत-संजय या दोघांनीही परिस्थितीचे कारण पुढे न करता समोर येईल त्या संकटाशी दोन हात केले. अपघात झाला किंवा कुटुंबावर संकट कोसळले तर माणूस पूर्णपणे खचून जातो. मात्र आपले हात पाय ठीक नसतानाही समोर येईल त्या संकटावर मात करत भागवत पवार आणि संजय कावरखे यांनी कठीण काळात संघर्ष कसा करायचा याचे जिवंत उदाहरण सर्वांसमोर स्वतःच्या कामातून उभे केला आहे.