लोणी काळभोर/थेऊर – येथील तलाठ्याने वरिष्ठ कार्यालयाने मागवलेल्या स्वयंस्पष्ट अहवालास तब्बल सात महिने विलंबाचा ब्रेक लावला असून वरिष्ठ कार्यालयास ठेंगा दाखवला आहे. संबंधित प्रकरणात 200 दिवसांहून अधिकची दिरंगाई झाली आहे. त्यामुळे हवेली महसूलचे काम अन् बारा महिने थांब असे म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी वारंवार तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्या बैठका घेऊन सातबारा दुरुस्ती, ऑनलाइन ई म्युटेशनच्या फेरफार नोंदी विना विलंब करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
तरीपण शेतकऱ्यांची गळचेपी करण्याचा प्रकार सुरुच राहिल्याने, न्याय कोठे मागायचा? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. लोणी काळभोर येथील फेरफार क्रमांक 9653 या फेरफाराचा अंमल गट नंबरला व्यवस्थित न झाल्याने, तसेच हस्तदोषाने हस्तलिखित गट नंबर 1928 व 2158 मधील सातबारामध्ये तलाठ्यांकडून झालेल्या चुकीची दुरुस्ती करण्याकामी शेतकऱ्याने हवेली तहसील कार्यालयात 3 ऑक्टोबर 2022ला अर्ज दाखल केला आहे. त्याबाबत तहसील कार्यालयाने संबंधित प्रकरणात लोणी काळभोर तलाठी यांचा अहवाल ऑक्टोबर 2022मध्ये मागितला आहे.
मात्र तब्बल 200पेक्षा अधिक दिवस होऊनही अहवाल तयार झालेला नाही व ते प्रकरण तलाठी कार्यालयातच पडून आहे. त्यामुळे शासकीय कर्तव्यात कसूर केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. तसेच नागरी सेवा हमी कायद्याचे उल्लंघन केल्याचेही स्पष्ट होत आहे. संबधित शेतकऱ्यांच्या अर्ज मागणीप्रमाणे अद्यापपर्यंत फेरफाराचा योग्य त्या अंमलाबाबत तहसीलदार यांचा आदेश होऊन सातबारा दुरुस्ती होणे अपेक्षित होते; मात्र सातबारा वरील दुरुस्ती अहवालाला तलाठ्यांनी खूपच विलंब लावला आहे.
“माझ्या वडिलांच्या नावावर कदमवाकवस्ती येथील गट नंबर 241 मधील क्षेत्र ऑनलाइन नोंदणीकृत ई म्युटेशनने सब रजिस्ट्रार कार्यालय क्रमांक 6 अन्वये खरेदी घेतलेले आहे. त्याची एसआरओ कार्यालयातून नोंद गावी दफ्तरी फेरफार क्रमांक 11849 झालेली आहे; मात्र त्या फेरफाराची नोटीस तलाठ्याने न भरल्याने त्यांना विचारणा केली असता पुढील आठवड्यात या, नोटीस काढून दिल्यानंतर त्यावर सह्या आणा असे सांगितले. फेरफार होऊन महिन्याचा कालावधी झाल्यानंतरही अद्याप नोटीस भरलेली नाही”, असे शेतकरी निलेश चव्हाण म्हणाले.
“लोणी काळभोर येथील तलाठ्याबाबत आलेल्या तक्रारीबाबत माहिती घेऊन ताबडतोब आजच त्याकामी योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच त्याचा डॅशबोर्ड तपासून पुढील कार्यवाही केली जाईल, “असे उपविभागीय अधिकारी संजय आसवले म्हणाले.
“हवेली तालुक्यातील नोंदणीकृत व अनोंदणीकृत ई फेरफारच्या नोंदीबाबत तांत्रिक अडचणी व नागरिकांच्या तक्रारीबाबत हवेलीमध्ये काम सुरू आहे. 62 दिवसांचा कालावधी 42 दिवसांवर आणलेला आहे. त्याचप्रमाणे पुढील आठवड्यात हवेली तालुक्यातील बैठक बोलावली असून त्यामध्ये योग्य त्या सूचना दिल्या जातील”, असे रजा राखीव उपजिल्हाधिकारी संजय तेली म्हणाले.
“पदभार स्वीकारल्यानंतर अनेक प्रलंबित कामे केलेली आहेत. नजरचुकीने काही अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवायचे राहिले असतील तर संबंधित अर्ज किंवा माहिती पाठवा, म्हणजे त्याबाबत पुढील कार्यवाही करते, ” असे तलाठी लोणी काळभोरचे तलाठी पद्मिनी मोरे म्हणाल्या.