मुंबई- आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाल्याचे दिसून आले. आज शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 185 अंकांनी कमी होऊन 55,381 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 61 अंकांनी म्हणजे 0.37 टक्क्यानी कमी होऊन 16,522 अंकावर बंद झाला.
रशिया-युक्रेन युद्ध रेंगाळत चालले आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत. काल चौथ्या तिमाहीचा विकास दर कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाली. या बाबीचा गुंतवणूकदारांच्या मनावर काही प्रमाणात परिणाम झाला. नेस्ले, टेक महिंद्रा, बजाज फिन्सर्व, सनफार्मा, हिंदुस्तान युनिलिव्हर, पावर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली.
तर महिंद्रा, एचडीएफसी, कोटक महिंद्रा बॅंक, टाटा स्टील, एचडीएफसी बॅंक, आयटीसी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत वाढ झाली असली तरी दुचाकी आणि ट्रॅक्टरची विक्री वाढलेली नाही. याचा शेअर बाजारावर संमिश्र परिणाम झाला असल्याचे दिसून आले असे जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले.
मे महिन्यामधील जीएसटी संकलनात काही प्रमाणात घट झाली आहे. त्याचाही गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम झाला. जागतिक बाजारातून संमिश्र संकेत आल्यामुळे भारतातील गुंतवणूकदारांना निर्णय घेता आले नाहीत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर अजून वाढतच आहेत. त्यामुळे भारतातील महागाइेवर दबाव राहण्याची शक्यता आहे. दरम्यान परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात विक्री चालू ठेवली असून काल या गुंतवणूकदाराने 1003 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.
आज 1800 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1450 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 132 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. आज फार्मा, उर्जा आणि रिऍल्टी या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे तर वित्तीय संस्था व भांडवली वस्तू क्षेत्रातील कंपन्याच्या शेअर्सची खरेदी झाल्याचे दिसून आले. मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्येही अर्ध्या टक्क्यांची घसरण झाली आहे.