पुणे – राज्यात कमाल तापमानात चांगलीच वाढ झाल्याने उन्हाचा चटका असह्य होऊ लागला आहे. मंगळवारी राज्यात सर्वाधिक तापमान अकोला येथे 43.8 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत.
मंगळवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातच्या काही भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान चाळीस अंशाच्या पुढेच नोंदविले गेले. पुण्यातही मंगळवारी किमान तापमान 22.0 तर कमाल तापमान 39.6 अंश सेल्सिअस इतके होते.
पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात वाढ होणार असून आकाश अंशत: ढगाळ राहणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.