मंत्री दिलीप वळसे पाटील ः अवसरी फाटा येथे व्यक्त केला आशावाद
मंचर- लोकांची दिशाभूल करण्यासाठी दूध दरवाढीबाबतचे आंदोलन राजकीय पक्षांच्या वतीने केले जात असून, हे योग्य नाही. राज्य सरकार दूध दर वाढीबाबत आवश्यक तो निर्णय घेईल, असा आशावाद कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.
राज्यातील काही भागात काही राजकीय नेत्यांनी दूध दरवाढीसाठी अहिंसक मार्गाने शनिवारी (दि. 1) आंदोलन करून दूध रस्त्यावर, दगडांवर ओतले आहे. या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करून अवसरी फाटा (ता. आंबेगाव) येथे प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री वळसे पाटील म्हणाले की, राज्यात व देशात करोनामुळे राज्य सरकारपुढे अनेक अडचणी आहेत. या परिस्थितीतही राज्य सरकारने अतिरिक्त दूध खरेदी संदर्भात योजना राबवली आहे. जेवढे शक्य आहे तेवढा दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे. अजून काही विषय मंत्रिमंडळाच्या समोर आहेत. सध्या दूध दरवाढीबाबत सुरू असलेले आंदोलन हे राजकीय आंदोलन आहे.
याबाबत गोवर्धन दूध उद्योग समुहाचे अध्यक्ष देवेंद्र शहा म्हणाले की, कुठल्याही राजकीय किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी शेतकऱ्याचे दूध रस्त्यावर फेकून राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करू नये. दुधाचे नुकसान न करता सनदशील मार्गाने आंदोलन करणे गरजेचे आहे. लॉकडाऊनमुळे दुधाच्या दरावर परिणाम झाला असून, मागील दोन ते अडीच महिन्यापासून दुधाचे दर घसरले आहेत.
लॉकडाऊनमुळे हॉटेल तसेच इतर ठिकाणी दुधाचा वापर अत्यंत कमी झाला आहे. शेती मालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांची केंद्र व राज्य सरकारकडे दूध दरवाढीची मागणी आहे. दुधाचे दर वाढले पाहिजेत. या मताचा मी असून, सध्या बाजारभावातील परिस्थिती पाहता दूध पावडरचे दर 140 ते 150 रुपये झाले आहे, त्यालाही गिऱ्हाईक नाही. त्यामुळे दूध व्यवसाय अडचणीत आले आहेत.
दूध व्यवसाय करणारे व्यावसायिक उद्योजकही अडचणीत आले आहेत. आंदोलनाला आम्ही साथ देऊ; परंतु स्वतःचे दूध घालायचे आणि दुसऱ्याचं रस्त्यावर फेकून द्यायचं या प्रकारच्या आंदोलनाला आमचा विरोध असेल. आम्ही त्याला साथ देणार नाही. दुधाचे भाव वाढण्यासाठी सरकार पातळीवर सगळे प्रयत्न करतात. पुढच्या एक-दीड महिन्यांत देशपातळीवर लॉकडाऊन उघडल्यानंतर पुन्हा दुधाचे दर प्रतिलिटर 25 ते 27 रुपये होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.