आमदार मोहिते प्रशासनावर भडकले ः लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नसल्याचा आरोप
राजगुरूनगर (प्रतिनिधी) – सरकारी नियम न पाळणाऱ्या एमआयडीसीमधील कंपन्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली आहे. सरकारी प्रशासनाच्या आणि कंपनी व्यवस्थापनाच्या भोंगळ कारभारामुळे खेड तालुक्यात करोना थैमान घालत आहे. लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता अधिकाऱ्यांनी मनमानी निर्णय घेतल्याने सर्वत्र करोनाबाधितांची संख्या वाढत आहे, असा घणाघाती आरोपही मोहिते यांनी केला आहे.
खेड तालुक्यात करोना बाधित व्यक्तींच्या संस्ख्या दीड हजारांवर पोहचली आहे. तालुक्यात करोनाची परिस्थिती आता हाताबाहेर जाऊ लागली आहे. अधिकारी, कंपनी व्यवस्थापन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राहिला नाही. त्यामुळे करोना रोखण्यात अपयश आले आहे. तालुक्यात आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकार याबाबत लोकप्रतिनिधींना सोडून अधिकाऱ्यांवर विसंबून राहिल्याने, तालुक्यात या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. या संकटाच्या काळातही भ्रष्टाचार करून, काहीजण मृताच्या टाळूवरचे लोणी खात आहेत, अशी टीका मोहिते पाटील यांनी केली.
बिलांची भरमसाठ आकारणी, अधिकारी “झापडबंद’
तालुक्यातील तीन नगरपरिषदा आणि चाकण आळंदी आणि राजगुरूनगर नगर परिषदेच्या परिसरातील गावांमध्ये करोना बाधित व्यक्तींची संख्या वेगाने वाढली आहे. ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, रुग्णवाहिका इत्यादींची पुरेशी व्यवस्था प्रशासनाला करता आली नाही. अधिकारी स्वतः काही करत नाहीत आणि लोकप्रतिनिधींशीही संवाद ठेवत नाहीत. या अव्यवस्थेमुळे गंभीर रुग्णांना जीव गमवावा लागण्याच्या घटना तालुक्यात घडत आहेत. यासह रुग्णालये बिलांची भरमसाट आकारणी करीत आहेत आणि अधिकारी झापडबंद बसले आहेत.
त्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा
आर्थिक चक्रे बंद राहू नयेत, यासाठी कंपन्या सुरू करण्यासाठी आम्ही आग्रही राहिलो. कंपन्या सुरू झाल्यावर कंपनी व्यवस्थापनाने खबरदारी घेणे आवश्यक होते. पण ते बेपर्वाईने काम करत आहेत. कंपन्यांना लागू केलेल्या अटी-शर्ती त्यांनी पाळलेल्या नाहीत. सोशल डिस्टन्ससह इतर नियम धाब्यावर बसवले. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात आलेल्या सरकारी अधिकाऱ्यांनीही या अटींचे पालन होते आहे की नाही, त्याच्याकडे लक्ष दिले नाही. यामुळे एमआयडीसीत रुग्णांची संख्या वाढत आहे. ती सुद्धा कंपनी प्रशासन लपवत आहे. तालुक्यात खरी आकडेवारी मिळत नाही. अनेक कंपन्यांचे आरोग्य विमा कंपन्यांशी टाइप असल्याने मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करीत कंपन्या आपल्या कामगारांना करोना झाल्यापासून लपवत आहेत, नियम न पाळणाऱ्या आणि माहिती लपविणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आमदार माहिते यांनी केली आहे.