वडगावशेरी –मुळा नदीत रसायनमिश्रित पाणी सोडण्यात येत असल्यामुळे नदीचे प्रदूषण वाढत आहे. कंपन्यांनी सोडलेले रसायनमिश्रित पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे संपूर्ण नदीपात्रातील पाणी दूषित होत असून दुर्गंधी सुटत आहे. नदीपात्रात जलपर्णी तयार होत असल्याने मच्छर, कीटक यांचाही त्रास नागरिकांना होत आहे. नदीकडेला राहणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे. विश्रांतवाडी, कळस, शांतीनगर येथील रहिवाशांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. याबाबत महापलिकेने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याची वारंवार तक्रार केलेली असताना या तक्रारीकडे दुर्लक्ष होत आहे.
या पाण्यात मिसळणाऱ्या रसायनामुळे पाण्यावर फेस तयार होत असून नदीतील मासे नष्ट होत आहे. रसायनमिश्रित पाणी, आजूबाजूच्या रहिवासी भागातील ड्रेनेजचे पाणी, नदीत कचरा, प्लॅस्टिक यामुळे नदीचे गटार झाले आहे. पाण्यावर तयार होणारा फेस हवेत उडतो. नदीच्या पाण्यामुळे डोळ्यांना, त्वचेला खाज सुटत आहे. मागील काही वर्षांपासून हा त्रास अधिक वाढला आहे. कळस येथे बांधलेला बंधाराही तुटलेला आहे तो बंधारा दुरुस्त करण्याचीही मागणी नागरिकांनी केली आहे. काही वर्षांपूर्वी येथे बोटिंग सुरू असायची, मात्र पाण्याची पातळी कमी असल्यामुळे ती बंद आहे.