-अमित डोंगरे
भारतीय संघाची निवड समिती अखेर विराट कोहलीसमोर नतमस्तक झाली. हे होणारच होते फक्त कधी तेच पाहायचे होते. श्रीलंकेत असलेल्या भारतीय संघातील पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यादव यांना आता कोहलीच्या संघात समाविष्ट होण्यासाठी इंग्लंडला रवाना केले जाणार आहे. या मागणीला पहिल्यांदा नकार देणारी निवड समिती अखेर बॅकफूटवर गेली, त्यामुळे ज्यावेळी भारतीय संघाचा जो कर्णधार असतो त्याच्याकडे पॉवरहाऊस म्हणून पाहिले जाते व त्याच्या तालावर निवड समिती नाचते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
मुळात शुभमन गिल दुखापतीमुळे मायदेशी परतला असला तरीही इंग्लंडमध्ये असलेल्या प्रमुख संघात उत्तम सलामीवीर तसेच मधल्या फळीतील फलंदाज असतानाही श्रीलंकेतून खेळाडू आयात करावे लागतात याला काय म्हणावे. म्हणजेच कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री व एकूणच संघ व्यवस्थापनाचा मयंक आग्रवाल, लोकेश राहुल यांच्यावर विश्वास नाही हेच स्पष्ट दिसते. कारण हे दोन चांगले सलामीवीर असतानाही पृथ्वी शॉ याची गरज का पडते.
मुळात इंग्लंडमध्ये शॉ आणि त्याच्या जोडीला सूर्यकुमार यादव कसोटी संघासाठी दाखल होत आहेत हाच मोठा विनोद आहे. कसोटीसाठी लागणारी संयमी मानसिकता दोघांकडेही नाही. तसे पाहायला गेले तर कसोटी संघात चेतेश्वर पुजारा वगळता अन्य एकाही फलंदाजामध्ये हा संयम नाही. पण तरीही कोहलीला पुजाराच्या जागी सूर्यकुमार का हवा आहे, तसेच आग्रवाल व राहुल असतानाही शॉची गरज का वाटते.
हाती असलेल्या कसोटी संघातूनच अंतिम 11 खेळाडू निवडण्यात कोणता प्रश्न निर्माण झाला आहे. राहुलने सराव सामन्यात शतकी खेळी केल्यावरही कोहलीला त्याच्यावर विश्वास का नाही. उलट राहुलला रोहितसह सलामीला पाठवत संघाला आक्रमक सुरुवात मिळेल असे कोहली व शास्त्री यांना का वाटत नसावे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत पराभूत झाल्यावर संघात मोठे बदल होतील असे संकेत देण्यात आले होते हे मान्य, पण पुजाराचा पर्याय शॉ कसा होऊ शकतो.
जो श्रीलंकेतील एकदिवसीय मालिकेत अनावश्यक फटकेबाजी करत बाद झालेला दिसून आला तो कसोटी संघाचा पर्याय होऊच कसा शकतो. सूर्यकुमार चांगला फलंदाज आहे, पण त्याला थेट इंग्लिश वातावरणात जेम्स अंडरसन किंवा स्टुअर्ट ब्रॉडसमोर नेऊन उभे करण्यात काय हाशिल आहे. तिथे तो अपयशी ठरला तर त्याच्यासाठी कसोटी संघाचे दरवाजे कायमचे बंद होण्याचा धोका नाही का. मुळात इंग्लंडमध्ये असलेल्या भारतीय संघात आक्रमक फलंदाजांची वानवा नाही.
रोहित शर्मा, खुद्द कोहली, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा हे आक्रमक फलंदाजीसाठीच ओळखले जातात. बरं शॉ आणि सूर्यकुमार म्हणजे ऍडम गिलख्रिस्ट व मॅथ्यू हेडन नाहीत, मग त्यांना कसोटी मालिकेसाठी पाचारण करण्यामागे कोणता विचार आहे. ही कल्पना कोणाच्या सुपीक डोक्यातून निघाली हे आणि असे बरेच प्रश्न पडले आहेत की, ज्याची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत.
मागे एकदा अनाकलनीय निर्णय घेत असलेल्या निवड समितीला तत्कालीन संघातील कसोटीपटू मोहिंदर अमरनाथ यांनी बंच ऑफ जोकर्स असे संबोधत हिणवले होते. आज काळ बदलला असला तरीही चित्र तेच आहे. संघाचा कर्णधार म्हणेल ती पूर्व दिशा असे मानण्याची परंपरा या निवड समितीनेही राखली. असो, चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती म्हणजे वाघाचे कातडे पांघरलेली शेळी आहे हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आता पुढील आठवड्यापासून कसोटी मालिका सुरू होईल आणि ती संपेपर्यंत सगळेच कोहलीच्या तालावर
नाचतानाही दिसतील.